स्वीकृत सदस्य निवडीत झालेला‘मिरज पॅटर्न’चा अवलंब महापालिका कारभारात थोपवावा अन्यथा याचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील असे गा-हाणे महापौर, उपमहापौरांसह २५ नगरसेवकांनी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांना घातले. पराभूत व पक्षविरोधी कारवाया करणा-यांना पायघडय़ा घालण्याचा प्रयत्न आत्मघातकी ठरेल असा इशाराही या नगरसेवकांनी दिला.
सांगली महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या महासभेत स्वीकृत आणि स्थायी सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सभेच्या प्रारंभी गटनेते किशोर जामदार यांनी काँग्रेसच्या तीन स्वीकृत सदस्यांची नावे असणारा लिफाफा महापौरांकडे दिला. नियमानुसार महापौरांनी या नावांची घोषणा केली. त्यानंतर महापालिका क्षेत्रातील काँग्रेसमध्ये असंतोष उफाळून आला. शेखर माने, गजानन मगदूम आणि आयुब पठाण या तिघांना काँग्रेसच्या कोटय़ातून स्वीकृत सदस्यपदाची लॉटरी लागली. यामुळे गेली पाच वष्रे राष्ट्रवादी काँग्रेस आणि विकास महाआघाडीच्या कारभाराचा पंचनामा करणा-या मदनभाऊ युवा मंचच्या नाराज कार्यकर्त्यांनी पदाचे राजीनामे देऊ केले. सतीश साखळकर, करीम मेस्त्री, आसिफ बावा आदींनी संघटनेचे राजीनामा देत असताना पक्षत्यागही करीत असल्याची घोषणा केली.
काँग्रेसच्या पर्यायाने मदन पाटील यांच्याशी निष्ठा वाहणा-या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली असताना महापालिकेतील सत्ताधारी गटाचे २५ नगरसेवक एकत्र आले आहेत. महापौर कांचन कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, राजेश नाईक, प्रदीप पाटील, पांडुरंग भिसे, दिलीप पाटील आदी २५ नगरसेवकांनी मदन पाटील यांची भेट घेऊन महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीबाबत नापसंती व्यक्त केली. महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्यांना मागच्या दाराने प्रवेश देणार नाही अशी घोषणा निवडणुकीच्या वेळी झाली असतानासुद्धा सोयीस्कर भूमिका घेतली जात आहे असे सांगत या नगरसेवकांनी महापालिकेच्या राजकारणात ‘मिरज पॅटर्न’सारखा अवलंब केला तर, विरोधकांकडून होणा-या टीकेला उत्तर कसे द्यायचे हा प्रश्न निर्माण होईल असे सांगितले.
नाराज नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मदन पाटील यांनी सांगितले, की तीन जागांसाठी इच्छुकांची संख्या अर्धशतकापर्यंत होती. त्यामुळे निवडीनंतर नाराजी निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र प्रभाग समिती, शिक्षण मंडळ यामध्ये आणखी काही कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल. दरम्यान, स्वीकृत सदस्य निवडीबाबत वैयक्तिक हस्तक्षेप केला नसल्याचे सांगत गटनेते किशोर जामदार म्हणाले, की या निवडी करण्यात पक्षश्रेष्ठींचा महत्त्वपूर्ण वाटा होता. संधी न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करणे स्वाभाविक असून, भविष्यात त्यांनाही संधी देण्याचा प्रयत्न पक्षनेतृत्वाकडून निश्चितपणे होईल.