कधीकाळी अन्य जिल्ह्यांतील फुलांवर अवलंबून असलेल्या नांदेडमधील विविधरंगी फुलांचा सुगंध आता मराठवाडय़ाबाहेरही दरवळत आहे. या व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगला आíथक हातभार लागत असला, तरी विविध समस्यांचा सामनाही करावा लागत आहे.
नांदेडात पूर्वी बहुतांश प्रकारची फुले अन्य भागांतून आयात होत होती. अलीकडच्या काळात मात्र चित्र बरेच बदलले आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत नवनवीन पिकांचे प्रयोग करण्याची मानसिकता शेतकऱ्यांमध्ये चांगलीच रुजली आणि रुळली आहे. नांदेड व मुदखेड तालुक्यांतील काही शेतकऱ्यांनी फुलशेतीचा प्रयोग सुरू केला आणि त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळू लागल्याने अन्य शेतकऱ्यांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत फुलशेतीचा अवलंब सुरू केला आहे. कंधार, लोहा तालुक्यांतल्या काही भागांतही फुलशेती आता चांगलीच बहरली आहे. पूर्वी गुलाब, झेंडू या फुलांची व्यापारी तत्त्वावर शेती केली जात होती. पण आता गुलाब, झेंडू, काकडा, लीली, गलांडा, कलकत्ता झेंडू, शेवंती या फुलांचे उत्पादन लक्षणीय वाढले आहे. कमी खर्च, कमी कालावधी व अत्यल्प पाण्यावर फुलशेती यशस्वी होते. सध्या शेतीच्या कामासाठी मनुष्यबळाची मोठी वानवा आहे, मात्र एकूणच फुलशेती लाभदायक ठरत असल्याचे शेतकरी सांगतात.
सर्वच प्रकारच्या फुलांचे दर अस्थिर असले, तरी कमी कालावधीत चांगले उत्पादन मिळते, असे सांगण्यात आले. कुठलाही कार्यक्रम किंवा शुभेच्छा देण्यासाठी आवश्यक पुष्पगुच्छांची शोभा वाढवणाऱ्या जरबेराचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. नांदेडपासून १५ कि.मी.अंतरावर असलेल्या चिमेगाव येथे जरबेराचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन केले जाते. पूर्वी औरंगाबादसह मराठवाडय़ातल्या सर्व जिल्ह्यांत नांदेडमधून फुले जात होती. पण अलीकडच्या काळात जिल्ह्यातल्या गलांडा, काकडा, शेवंती या फुलांना पुणे, मुंबईसह अनेक भागांतून मागणी वाढली आहे. दररोज या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होते. गणेशोत्सवाच्या काळात जवळपास दहा लाख रुपयांच्या फुलांची विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरलेल्या फुलशेतीमुळे फुले सहज उपलब्ध होत असली, तरी शेतकऱ्यांना या अनुषंगाने काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. नांदेडच्या कलामंदिर भागात सकाळी फुलांचा बाजार भरतो. वेगवेगळय़ा भागातून येथे फुले आल्यानंतर त्याची विक्री होते. ज्या जागेवर हा बाजार भरतो ती जागा बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याने बाजार कुठे भरवावा, असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. महापालिकेने िहगोली गेट परिसरात काही दिवसांपूर्वी जागा देण्यासंदर्भात ठराव मंजूर केला होता, पण त्याच्या भाडय़ाची आधारभूत किंमत मोठी असल्याने कोणीही तेथे फिरकले नाही. शहरात आम्हाला छोटी का होईना जागा महापालिकेने उपलब्ध करून द्यावी, त्यासाठी नाममात्र भाडे देण्याची आमची तयारी आहे. या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन फुल विक्री करणाऱ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा जिल्हा होलसेल अँड रिटेल फुलविक्रेता असोसिएशनने व्यक्त केली. या व्यवसायावर ७० ते ८० हजार लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे या व्यवसायासाठी त्वरित जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष अ. अलीमखान अ. हमीदखान यांनी दिला.