गांजा जवळ बाळगल्याच्या आरोपाखाली ओडिशा येथील चार युवकांना सत्र न्यायालयाने ५ वर्षे कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
राजेश कुष्टी (२०), पूर्णचंद्र नायक (२०), राजू दिघड (२०) व रंजन बेहरा (२८) अशी आरोपींची नावे असून ते ओडिसातील नरसिंगपूर (कटक) येथील रहिवासी आहेत. या चार युवकांजवळ गांजा असल्याची गुप्त माहिती गिट्टीखदान पोलिसांना १९ ऑगस्ट २०११ रोजी मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी या तरुणांना गणेशपेठ येथील बसस्थानकावर ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली.
या झडतीत त्यांच्याजवळून ६१ हजार रुपये किमतीचा ५३ किलो गांजा जप्त करण्यात आला. पोलिसांनी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक केली. तपासानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
चारही आरोपींविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याचा निर्वाळा देऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.पी. चांडक यांनी  त्यांना अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये प्रत्येकी ५ वर्षे कारावास आणि ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील वसंत नरसापूरकर यांनी, तर आरोपीतर्फे अ‍ॅड. अशोक भंगाले यांनी काम पाहिले.