‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल’ मुंबई आणि ‘नादब्रह्म’ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधर्वनाद’ हे त्रवार्षिक संमेलन यावर्षी नागपूर येथे थाटामाटात संपन्न झाले. ‘नादब्रह्म’ ही स्थानिक संस्था यावेळी यजमानपदी होती. दर तीन वर्षांनी अखिल भारतीय पातळीवर अशा संमेलनाचे आयोजन केले जाते. संगीताच्या प्रचार आणि प्रसाराचे पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे कार्य अशा प्रकारच्या संमेलनातून चालू आहे, ही यातील सर्वात महत्त्वाची उपलब्धी म्हणता येईल. यानिमित्ताने निघालेल्या स्मरणिकेचे संपादन करताना ‘नादब्रह्म’ संस्थेच्या आयोजनाकडे जवळून पहाणे शक्य झाले आहे. म्हणूनच या संमेलनाची एकूण दखल या स्तंभातून घेणे गरजेचे वाटले.
‘नादब्रह्म’ संस्थेने ते अतिशय जबाबदारीने मेहनतीने, कल्पकतेने आणि आत्मीयतेने पार पाडले. बोधनकर पितापुत्रांनी ‘नादब्रह्म’चे रोपटे रुजविले. त्यांच्या पश्चात त्यांचा चाहता शिष्यवर्ग संस्थेला ‘रौप्यमहोत्सवी’ वर्षांत घेऊन जात आहे. श्वेता शेलगावकर यांचे सफाईदार निवेदन लक्षणीय होते. या तीन दिवसीय कार्यक्रमात परिसंवाद आणि प्रत्यक्ष गायनवादनाचे कार्यक्रम, असा सुयोग्य मेळ संगीतविषयक जिज्ञासूंसाठी ही खरोखरच पर्वणी होती. अनेक विद्वानांनी, तज्ज्ञांनी या परिसंवादातून, चर्चासत्रातून, प्रात्यक्षिकातून जिज्ञासूंना महत्त्वपूर्ण विचार दिले. आजच्या काळात संगीत शिक्षकांची भूमिका, हवेली संगीत, स्वरलिपीचे महत्त्व व आवश्यकता, धृपद गायनाची परंपरा, भारतीय संगीतात तालाचे महत्त्व, इलेक्ट्रॉनिक वाद्ययंत्र आणि भारतीय संगीत, संगीत आणि आयुर्वेद, कथकादी कथ्थक, नवीन पाठय़क्रम इत्यादी जिव्हाळ्याचे आणि कुतूहलाचे विषय याप्रसंगी आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ व व्यासंगी मंडळींनी हे विचार मांडल्यामुळे त्याचे मूल्य अनन्य साधारणच म्हणावे लागेल. हेरंबराज पाठक, पं. यशवंत महाले, गुरू पुरुदाधिच, श्रीराम सुंदर संगमकर, डॉ. मधुभट्ट तेलंग, डॉ. मुकुंद भाले, सचिन चंद्रांते, दिग्विजय वैद्य, वैद्य सत्यव्रत नानल, रोशन दाते आणि सुधा पटवर्धन यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा या व्याख्यानसत्रातून नक्कीच प्रत्यय आला.
तीनही दिवस होणाऱ्या संमेलनाच्या प्रारंभी युवा शहनाईवादक विज्ञानेश्वर खडसे यांच्या शहनाईवादनाला रसिकांनी दाद दिली. या नििंमत्ताने तीन सायंकालीन संगीत सभा रसिकांना आनंद देऊन गेल्या. पहिल्या संगीत सभेत शिरीष भालेराव आणि श्रीकांत पिसे यांची व्हायोलिन आणि होर्मोनियम जुगलबंदी प्रथम सादर झाली. तबल्यासाठी होते भावसार. शिरीष आणि श्रीकांत या नागपूरच्या कलावंतांनी संगीतसभेचा सुरेल प्रारंभ करून दिला. यावेळी त्यांनी राग ‘वाचस्पती’मध्ये सुरेल सहवादन केले. शिरीष भालेराव हे तर प्रस्थापित आणि गुणी कलावंतच आहेत, हे सर्वश्रुतच आहे. श्रीकांत पिसे हेसुद्धा नव्या दमाचे मेहनती कलावंत आहेत, हे सिद्ध झाले आहे. प्रथम ‘रूपक’ ताल व नंतर तीनतालातील गतवादनातून उभयतांनी मधुर श्रवणीय प्रस्तुती केली. त्यांची तयारी हाताचा गोडवा, तालाचा अंदाज केवळ अप्रतिम होता. अखेरीस ‘वैष्णवजन तो’ या भजनाने त्यांनी सांगता केली आणि ‘बाळासाहेब ठाकरे’ यांना व नागपूरचे हार्मोनियमवादक पं. वालदूरकर यांना श्रध्दांजली अर्पण केली.
त्यानंतर शैलेश गावकर (गोवा) यांचे एकल तबलावादन झाले. त्यांना श्याम ओझा यांनी लहरा संगत केली. तीनताल सादर करीत असता कायदा, गत, मिश्रजातीमधील रचना, दिल्ली, लखनौ घराण्याची झलक त्यांनी दाखविली. त्यानंतर पिय सरखेल (राजकोट) यांचे गायन झाले. त्यांना अनुक्रमे श्याम ओझा, देवेंद्र दवे, नेहा व अनघा यांनी पेटी-तबला व तानपुरा संगत केली. ‘रागेश्री’ रागात ‘एरी पियानही’ हा विलंबित ख्याल व दृत तीनतालातील ‘बेगुनको गुण दे दाता’ व अति दृतमध्ये ‘आयी मोरे दरबार’ ही बंदिश सादर केली. आवाजाची उत्तम रेंज त्यांच्याकडे आहे. तालीम आहे. त्यामुळे त्यांचे गायन श्रवणीय झाले. अखेर ‘म्हारे घर आवोजी’ या मीराभजनाने त्यांनी आपल्या गायनाचे समापन केले. ही श्रद्धांजली संगीत सभा होती.  
दुसऱ्या संगीत सभेत प्रथम डॉ. देवेंद्र यादव (वर्धा) राजेंद्र मौदेकर (बिलासपूर) यांची तबला जुगलबंदी झाली. उभयतांच्या तडफदार व तालीमयुक्त वादनाने रसिक खूष झाले. तीनतालात कायदा, गत इ. पेश करीत असता विविध घराण्यांची छाप त्यांनी निदर्शनास आणली. त्यांच्याजवळ उत्तम तालमीचे बोल आणि शैली आहे. गोविंद गडीकर यांनी सफाईदार व समजदारीने केलेली लहरासंगत लक्षात राहील. त्यानंतर डॉ. चित्रा मोडक यांचे दमदार गायन सादर झाले. त्यांना अनुक्रमे राजू गुजर, श्याम ओझा यांनी पूरक अशी तबला व हार्मोनियम संगत केली. तानपुऱ्यावर मंजिरी व अनघा होत्या. राग बागेश्रीमध्ये ‘कौन गात भयी’ हा परिचित बडा ख्याल आणि ‘रात मोरी बालमने’ ही दृत एक तालातील बंदिश त्यांनी प्रथम सादर केली. शिस्तबद्ध बढत, दाणेदार ताना आणि वजनदार गायकी यामुळे हे गायन प्रभावी ठरले. नंतरचा ‘नैना मोरे तरस गये’ हा दादरा केवळ अप्रतिम होता. ढंगदार प्रस्तुती, सुंदर जागा, विविध रागांच्या छटा यामुळे हा दादरा दाद घेऊन गेला. ठराविक वेळेत उत्तम सादरीकरण करण्याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला, हे मुद्दाम नमूद करायला हवे. या संगीतसभेची सांगता प्रदीप बारोट यांच्या सुरेल सरोदवादनाने झाली. त्यांना तबलासंगत शोम पाटील यांनी केली. त्यांनी ‘बागेश्री’ राग प्रथम निवडला. अगोदरच सभेत तो राग निवडला गेला होता. त्यामुळे त्यांनी दुसरा राग निवडला असता तर अधिक बरे झाले असते. या रागात आलाप जोड व त्यानंतर मध्य लय रूपक व दृतलय तीनतालात त्यांनी वादन सादर केले. आग्रहास्तव त्यांनी एक मिश्र रचना सादर केली. ती अतिशय रंजक, सुरेल, गोड वाटली.
तिसऱ्या दिवशीची संगीत सभा मोहनवीणा वादनाने सुरू झाली. सूरमणी सतीश खानविलकर यांना उल्हास राजहंस यांनी तबला संगत केली. ‘पटदीप’ सारखा गोड राग फार क्वचित ऐकायला मिळतो. म्हणूनच त्याचे अप्रूप वाटले. आलाप जोड झाला व त्यानंतर ९ मात्रांवर आधारित व १६ मात्रांवर आधारित गतवादन सादर करीत असता त्यांनी रागाची शुद्धता व मधुरता निदर्शनास आणली. तीनही सप्तकात सुरेल वादन करून त्यांनी छाप पाडली. त्यानंतरची प्रस्तुती होती ती बासरी-सहवादनाची. राजेश प्रसन्ना व रिषभ प्रसन्ना यांना बासरी वादनासोबत मिलिंद इंदूरकर यांनी तबलासंगत केली. त्यांनी राग ‘गोरख कल्याण’ प्रथम सादर केला. विलंबित गत वादनानंतर मध्य लय व द्रुत लय तीनतालात गत वादन केले. उभयतांचे समजदारीने केलेले सहवादन अतिशय मधुर होते. गोफ विणावा तसे क्रमाने सहज सुंदर वादन झाले. ‘मिश्रपिलू’ मधील ठुमरीने वादनाचे समापन झाले. कार्यक्रम सुरेल श्रवणीय होता.
या समारोपाची सांगता ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या गायनाने झाली. सुविद्य व बुद्धिमान गायिका अशी त्यांची ख्याती आहे. खास जयपुरी बाजाचा ‘खेम कल्याण’ हा जोड राग त्यांनी निवडला. ‘बलमवा तुमबीन’ हा बडा ख्याल (तीनताल) आणि ‘पिहरवा मै कही ओर’ ही द्रुत तीन तालातील बंदिश त्यांनी विस्तृतपणे मांडली. अनवट राग असल्यामुळे असेल कदाचित, परंतु तो रसिकांपर्यंत पोहोचायला आणि रंग भरायला थोडा अवधी जावा लागाला, परंतु हळूहळू रंग गडद व्हावा तशी रंगत वाढत गेली. सुरासुरांचे वीणकाम त्यातील नक्षीकाम बोल अंगाने प्रगट होत गेले. खणखणीत तार षडजावरचा न्यास व नंतरची कामगत केवळ अप्रतिम होती. त्यानंतर परिचित रंजक राग केदारमधील ‘मालनीया सज चली’ आणि ‘नवेली नार’ या दोन बंदिशी अनुक्रमे मध्यलय झपताल आणि द्रुत एकतालात त्यांनी सादर केल्या. बडेगुलाम अली खां गात असत ती द्रुत बंदिश त्यांनी अप्रतिम सादर केल्या. त्यांना साथसंगत करणारे कलावंत होते अनुक्रमे तबला व पेटीसाठी यती भागवत व सिध्देश बिचोलकर.
या उभयतांचा अनुभव तसा कमीच होता. ते उदयोन्मुख कलावंत आहेत यात शंकाच नाही, परंतु त्यांच्या गायनाला अधिक तयारीच्या वादकांची साथ हवी होती म्हणजे रंग अधिक भरला असता, असे वाटले आणि मुख्य कारण म्हणजे त्यांच्या गायनाचा दर्जा एकदमच वरचा आहे. असो.  एकूण ‘गांधर्वनाद’ संगीत समारोह गुणवत्ता व आयोजन दोन्ही दृष्टीने उत्तम होता.