कोथरुड येथील पृथ्वी हॉटेलवर झालेला गोळीबार हा खंडणीच्या उद्देशाने झाल्याचा पोलिसांचा संशय असून त्या दृष्टीने स्थानिक व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हॉटेलमध्ये सापडलेली गोळी ही गावठी पिस्तुलातून झाडल्याचे समोर आले आहे. कोथरुड भागातील सराईत गुन्हेगार लख्या उर्फ लक्ष्मण जाधव याचा या गोळीबारामागे हात आहे काय, याचाही पोलीस शोध घेत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार करून जाधव फरार झाला होता. अगोदर गोळीबार करून दहशत माजवायची, त्यानंतर खंडणीची मागणी करायची अशी पद्धत गेल्या काही गुन्ह्य़ात जाधव याने वापरली आहे. त्यामुळे खंडणी मागण्याच्या उद्देशानेच हा गोळीबार केला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. लख्या जाधववर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी अशा स्वरूपाचे गंभीर बारा गुन्हे दाखल आहेत. त्याने कोथरूड भागात दहशत निर्माण केल्यामुळे गेल्या सात-आठ महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर आहेत. मात्र, तो सारख्या जागा बदलत असल्यामुळे पोलिसांना मिळून आलेला नाही.