प्रसार माध्यमातील बनावट जाहिरातींमुळे नागरिकांची फसवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. अशा घटनांची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली आहे. नुकत्याच एका प्रकरणात ‘चेहरा ओळखा’ या स्पर्धेच्या आधारे फसवणूक झालेल्या निशा दादाराव देशभ्रतार हिने इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
एम्प्रेस मिल कॉलनीत राहणाऱ्या निशाने एका हिंदी वर्तमानपत्रातील जाहिरातीतील ‘कलावंताचा चेहरा’ ओळखून दिलेल्या क्रमांकांवर फोन केला. ‘तुला एक लाख रुपये पाहिजे की टाटा सफारी’ अशी विचारणा फोनवरून निशाला करण्यात आली. निशाने पैसे पाहिजे असे सांगितले. बक्षीस मिळण्यासाठी आधी कर भरावा लागेल, असे निशाला सांगण्यात आले आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ३००६१२६१३९० या खाते क्रमांकावर कराचे पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार निशाने पैसे भरले. नंतर मात्र, तिचा फोन घेण्यास टाळाटाळ करण्यात आली आणि फोनही ‘स्विच ऑफ’ करण्यात आले होते. निशाने इतरांना सावध करण्यासाठी ताबडतोब पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार केली. तेव्हा अशाप्रकारच्याच इतरही तक्रारी आल्याची माहिती तिला मिळाली.
अशा फसवणुकीमध्ये केवळ गरीब किंवा अशिक्षित नागरिकांचीच फसवणूक होत नसून उच्च शिक्षित अभियंता, बँकेचे अधिकारी देखील अंधश्रद्धेपोटी किंवा जास्त पैसे मिळतील या लोभाने अशा जाहिरातींच्या मागे लागून स्वत:चे नुकसान करून घेतात. गिट्टी खदान भागातील एका गरीब आदिवासी महिलेने ‘सर्व प्रकारच्या मोबाईल कंपन्यांना टॉवरसाठी जागा पाहिजे’, या जाहिरातीवर विश्वास ठेवून दिलेल्या खाते क्रमांकावर पैसे जमा केले. नंतर तिची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तिने पोलीस ठाणे गाठले. मोबाईलवर आलेल्या एका एसएमएसवर विश्वास ठेवून अभियंत्याने १७ लाख रुपये दुसऱ्या खात्यावर जमा करून स्वत:ची फसवणूक करून घेतली. त्यासाठी मित्रांकडून कर्ज घेतले. अशी अनेक प्रकरणे पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेकडे तपासासाठी आलेली आहेत.
यासंदर्भात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक माधव गिरी यांनी जाहिरातींच्या माध्यमातून फसवणुकीच्या प्रकरणांचा तपास कामांचा ‘सक्सेस रेट’ खूप कमी असल्याचे सांगितले. कारण जे लोक फसवणूक धंदा करतात ते जवळच्या माणसाला त्यात न गोवता अपरिचित माणसांना लक्ष्य करतात. त्यांनी दिलेले बँक खाते क्रमांकही बनावट असतात तर मोबाईलचे सीम केवळ फसवणुकीच्या दृष्टीनेच उपयोगात आणले जाते. त्यामुळे मोबाईल नंबरचा पुर्ण डाटा तपासला असता फसवणूक झालेल्यांची यादी मोठी असते. मात्र, अशी माणसे निसटून जातात. परराज्यात बसून ते अशाप्रकारचे धंदे करीत असतात. म्हणून त्यासाठी नागरिकांनीच सतर्क रहायला हवे. कोणी न मागता लाखो, कोटय़वधी रुपये आपल्याला का देईल, असा प्रश्न विचारून स्वत:ची फसवणूक टाळायला हवी.