प्रवाशांचे उन्ह, पाऊस व थंडीपासून संरक्षण व्हावे, तसेच पिण्याच्या पाण्याबरोबर शौचालयाचीही व्यवस्था व्हावी, यासाठी जिल्ह्य़ातील गावागावांत शासनाकडून बसस्थानके उभारण्यात आली. मात्र या बसस्थानकांची स्थिती इतकी बकाल झालेली आहे की, प्रवाशांना शेजारच्या पानटपऱ्या व हॉटेल्सचा आश्रय घ्यावा लागत आहे. सर्वाधिक त्रास महिला प्रवाशांना सहन करावा लागत आहे. बहुतांश बसस्थानके शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र दिसते.
गोंदिया व तिरोडा या आगाराच्या ठिकाणाशिवाय देवरी व आमगाव येथे मोठे व पक्केबसस्थानक आहे, तर गोरेगाव, सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव येथे लहान बसस्थानके , तर अर्जुनी मोरगाव येथे बसस्थानकाच्या नावावर केवळ छपरी आहे.  राज्य परिवहन महामंडळाचे उदासीन कामकाज, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आदी कारणांमुळे येथील बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. गोंदिया व तिरोडा बसस्थानकावरून जिल्ह्य़ातील अनेक गावांसह जिल्ह्य़ाबाहेरही व लगतच्या मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्येही बसेस सोडल्या जातात. गोंदियातील बसस्थानकातील  कॅन्टीन व इतर दुकाने गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. अस्वच्छतेने तर कळस गाठला असून प्रवाशांना तोंडावर रुमाल ठेवून येथे उभे राहावे लागते. तिरोडा, देवरी बसस्थानक प्रेमवीरांच्या भेटण्याचे स्थान झाल्याची ओरड प्रवाशांकडून होत आहे.
अर्जुनी मोरगाव येथे प्रस्तावित बसस्थानकाचे काम प्रलंबित आहे, तर आमगाव गावापासून बरेच दूर असल्यामुळे येथील बसस्थानक पांढरा हत्ती ठरला आहे.  गोरेगाव व सडक अर्जुनी येथे बसस्थानकाच्या नावावर केवळ प्रवासी निवारे उभे आहेत.  हजारोंपैकी बहुतांश प्रवासी निवारे पडले असून त्याठिकाणी घाण व कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे, तर काही प्रमाणात चांगल्या स्थितीत असलेल्या प्रवासी निवाऱ्याचा उपयोग नागरिक विविध कामांसाठी करीत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे जिल्ह्य़ातील ही प्रवासी निवारे ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी कुचकामी ठरलेले आहेत.

पाठपुरावा करणे गरजेचे
प्रवासी निवारे हे बहुतांश आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून तयार करण्यात आलेले आहेत, मात्र त्या ठिकाणी पिण्याच्या व शौचालयाच्या सोयी नसल्याने प्रवाशांसाठी ते कुचकामी ठरले आहेत. निवारे उभे करून दिल्यानंतर आमदारांनी काही वर्षांनी त्याचे काय झाले, याचा पाठपुरावा केलेला दिसत नाही.