विहिरीत बुडत असलेल्या मुलाला वाचवण्यासाठी आईने विहिरीत उडी घेतली, मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघांचाही विहिरीत बुडून मृत्यू झाला. खुपिरे, ता. करवीर येथे ही दुर्दैवी घटना घडली. रीतेश मारुती वाळवेकर (वय १०), सुरेखा मारुती वाळवेकर (वय ३२, दोघेही रा. खुपिरे, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. खुपिघटणेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.
    या बाबत पोलिसांनी सांगितलेली अधिक माहिती अशी, खुपिरे येथे नागरिका स्पििनग मिल मार्गावर बाब्याचे शेत आहे. त्याला लागून वाळवेकर मळा आहे. येथे मारुती वाळवेकर यांची शेती आहे. या शेतात त्यांची विहीर आहे. गावात पाणी नसल्याने कपडे  धुण्यासाठी व जनावरांना वैरण आणण्यासाठी मारुती वाळवेकर यांच्या पत्नी सुरेखा सकाळी ९.३०च्या सुमारास आल्या होत्या. या वेळी त्यांच्यासोबत त्यांची दोन मुले सानिका व रीतेश होते. विहिरीवर जाऊन त्यांनी कपडे ठेवले व जवळच असलेल्या शेतात त्या वैरण काढण्यासाठी गेल्या. या वेळी रीतेश व सानिका विहिरीच्या काठावर खेळत होते. रीतेश गावातील प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत होता. तर सानिका पहिल्याच्या वर्गात शिकत होती.
खेळताना त्याचा पाय घसरला व तो विहिरीत पडला. या वेळी त्याची लहान बहीण सानिकाने आरडाओरडा केला. रीतेश विहिरीत पडल्याचे बघून तिने आरडाओरडा सुरू केला. तिचा आरडाओरडा ऐकून सुरेखा धावत विहिरीजवळ आली.
मुलगा पडल्याचे समजताच त्याला वाचवण्यासाठी तिनेही विहिरीत उडी मारली. पण त्यांनाही पोहता येत नसल्याने दोघेही विहिरीत घुटमळले. विहीर मळय़ात असल्याने आजूबाजूला वाचवणारे कोणी नव्हते. यामुळे त्या दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. घाबरलेली सानिका तसेच रडत गावाच्या दिशेने आली गावात आल्यावर तीने गावकऱ्यांना झालेली हकिगत सांगितली. यानंतर गावकऱ्यांनी जाऊन पाहिले असता चप्पल व वैरणीचा बिडा विहिरीच्या काठावर पडलेला दिसला. यानंतर खुपिरेचे सरपंच विलास परनारे, उपसरपंच रणजित पाटील कुंभी सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय बळवंत पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय बळवंत पाटील यांनी पंचनामा करून दोघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. यानंतर सायंकाळी सीपीआर रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली व त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.