नवी मुंबई महापालिका आणि ‘परिवार सह्य़ाद्री समूह’ यांच्या संयुक्त विद्यमाने अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या मतिमंद मुलांच्या राष्ट्रीय पालक परिषदेचा उद्घाटन सोहळा मोठय़ा उत्साहात साजरा झाला. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
नवी मुंबई महापालिकेतर्फे मतिमंद मुले आणि त्यांचे पालक यांसाठी विशेष प्रयत्न केले जात असून येणाऱ्या काळात यासाठी भव्य असे धोरण राबविले जाईल, असे नाईक यांनी सांगितले. महापालिकेच्या ई.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे काम केले जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच यापरिषदेच्या माध्यमातून अपंग मुलांचे पालक एकत्र येऊन विविध समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील, अशी आशाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. यावेळी ‘पेरेन्टस् असोसिएशन ऑफ मेंटली हँडीकॅप’ या संस्थेचा उत्कृष्ट पालक समिती म्हणून गौरव करण्यात आला. या वेळी महापौर सागर नाईक, खासदार संजीव नाईक, उप-महापौर अशोक गावडे, आयुक्त भास्कर वानखेडे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी आयुक्त भास्कर वानखेडे यांनी यामुलांमध्ये असलेली ऊर्जा सकारात्मक पद्धतीने रुपांतरित करणे गरजेचे असून या मुलांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे असे सांगितले.