लोकप्रिय आणि वाचकप्रिय लेखक सुहास शिरवळकर अर्थात ‘सुशि’यांनी त्यांच्याच विविध कादंबऱ्यांसाठी लिहिलेल्या अर्पणपत्रिका माहितीच्या महाजालावर आल्या आहेत.
suhasshirvalkar.blogspot.in
या संकेतस्थळावर शिरवळकर यांनी लिहिलेल्या सुमारे ३५ कादंबऱ्यांच्या अर्पणपत्रिका देण्यात आल्या आहेत. एखाद्या लेखकाने त्याच्याच साहित्यकृतीसाठी लिहिलेल्या अर्पणपत्रिकांचे संकलन करून त्या माहितीच्या महाजालात आणण्याचा हा प्रयत्न अपवादात्मक असावा.
शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी’या कादंबरीवर याच नावाचा चित्रपट निघाला आणि तो प्रचंड प्रमाणात गाजला. ‘दिग्या, श्रेयस, नितीन, अश्क्या, साईनाथ, प्रीतम, शिरिन, मनु, राणी मॉं आणि एम के. ‘दुनियादारी’तील ही पात्रे ज्यांच्यामुळे निर्माण झाली, त्या ‘कट्टा गॅंग’ला, असे या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या अर्पणपत्रिकेत शिरवळकर यांनी लिहिले होते. ‘कोवळीक’ या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीच्या अर्पणपत्रिकेत शिरवळकर यांनी ‘चार वर्षांच्या अल्पावधीत ज्यांनी सहस्रकरांनी अनुभवाचं विश्व उधळलं त्या बी.एम.सी.सी. मधल्या समृद्ध क्षणांना- रोल नं. वन फोर सेव्हन टी. वाय. बी’असे म्हटले आहे.
महिलांवरील अत्याचार, बलात्कार याविषयीच्या बातम्या प्रसारमाध्यमातून येत असतात. शिरवळकर यांच्या ‘प्रतिकार’ या कादंबरीच्या तिसऱ्या आवृत्तीच्या अर्पणपत्रिकेत ‘बलात्कार’ या विषयावर अर्पणपत्रिका लिहिताना शिरवळकर यांनी म्हटले आहे की, ‘मुझे इंतजार है, बलात्काराच्या बातम्या होणार नाहीत. चर्चा होणार नाहीत. अशा दुर्देवी तरुणीकडे वाईट, संशयी नजरेनं पाहिलं जाणार नाही. स्त्रीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला जाणार नाही. शरमेनं समाज मान खाली घालेल आणि एक तरी तरुण स्वीकारासाठी हात पुढे करेल. कलम नंबर शंभरचा खरा अर्थ मनामनात रुजेल, त्याचे उद्घोष होतील.. वो सुबह कभी तो आएगी..
या खेरीज ‘ऑब्जेक्शन युवर ऑनर’, ‘समथिंग’, ‘मधुचंद्र’, हमखास’, ‘क्षणोक्षणी’, ‘क्षितीज’, जाता येता’, ‘झुम’, ‘वास्तविक’, ‘निदान’, ‘वेशीपलिकडे’, ‘कल्पांत’, ‘सॉरी सर’ आदी कादंबऱ्यांच्याही अर्पणपत्रिका देण्यात आल्या आहेत.