टंचाईच्या पाश्र्वभूमीवर येवला पालिकेची बंद पडलेली येसगाव (ता. कोपरगाव) येथील पाणी योजना पुनर्जीवित करण्यासाठी तसेच याद्वारे मनमाडच्या वारंवार उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत अध्र्या तासापेक्षा अधिक वेळ चर्चा घडवून आणली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तपासून सादर करण्याची सूचना दिली आहे. यामुळे मनमाड, येवला व परिसरातील शेकडो गावांच्या पाणीपुरवठय़ाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
१९६५ मध्ये येवल्यासाठी येसगाव येथे साठवण तलाव करून पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली होती. मात्र सदरची योजना अनेक वर्षांपासून बंद आहे. येसगाव येथील योजनेच्या पाण्याचा स्रोत हा गोदावरी कालव्यांवर असल्यामुळे पाण्याची उपलब्धता पुरेशी आहे.
त्यामुळे येसगाव येथील बंद पडलेली योजना पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यापूर्वीच पाणीपुरवठा विभागाला दिले होते. सदर योजना मार्गी लागल्यास भविष्यात येवला व मनमाड तसेच  आजूबाजूच्या शेकडो गावांना दिलासा मिळणार आहे.
या योजनेसाठी टंचाई आराखडय़ातून जलवाहिन्या टाकण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.