सोलापूर शहरात पायाभूत विकासकामांची वानवा असताना त्याकडे लक्ष देऊन शहर विकसित करण्याचे प्रथम कर्तव्य बाजूला ठेवून महापालिका प्रशासनाने शहरात मेट्रो रेल्वेसेवा सुरू करण्याचा विचार सुरू केला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडे पाठविला आहे. अगोदर सिटी बससेवा सशक्त करून ऊर्जितावस्थेत आणावी आणि मगच मेट्रो रेल्वेचा विचार करावा, अशी प्रतिक्रिया सामान्य करदात्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शहरात रस्ते, पाणी, दिवाबत्ती, जलनिस्सारण, मलनिस्सारण, आरोग्य, दवाखाने, प्राथमिक शिक्षण, उद्याने, बससेवा आदी जवळपास सर्वच पायाभूत सेवा चांगल्याप्रकारे उपलब्ध करून देण्यास महापालिका कमजोर ठरली आहे. पन्नास वर्षे पूर्ण करूनदेखील महापालिका पिछाडीवर आहे. आर्थिक उत्पन्नाच्या बाबत तर ही महापालिका अक्षरश: कफल्लक बनली आहे. त्यातच प्रशासनातील ढिसाळपणा, भ्रष्टाचार, नियोजनशून्यता, अपुरे मनुष्यबळ व इतर कारणांमुळे महापालिकेची घसरण सुरूच आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी पालिकेच्या निवडणुकांच्या वेळी सत्ताधारी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात येत्या पाच वर्षांत विविध विकास योजना राबविण्याचे आश्वासन देताना त्यात मेट्रो रेल्वे प्रकल्प उभारण्याचेही वचन दिले होते. त्या वेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काँग्रेसविरोधात राष्ट्रवादीच्या प्रचार सभेत काँग्रेसने शहरात मेट्रो रेल्वे प्रकल्प उभारण्याबाबत दिलेल्या वचनाची अक्षरश: टर उडविली होती.
सद्य:स्थितीत महापालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असताना काँग्रेसने निवडणुकीत दिलेल्या वचनाप्रमाणे मेट्रो रेल्वे प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने चाचपणी केली जात आहे. पालिका प्रशासनाने तसा प्रस्ताव तयार करून रेल्वेकडे पाठविला आहे. शहर व परिसरात १५० किलोमीटर अंतरामध्ये मेट्रो रेल्वे सुरू करण्याची योजना आखण्यात येत आहे. यात रेल्वेने त्यांच्याकडील तंत्रज्ञ उपलब्ध करून द्यावेत व इतर आवश्यक सुविधांबाबत महापालिकेला सहकार्य करावे, असे पत्र पालिका आयुक्त अजय सावरीकर यांनी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे सरव्यवस्थापक ए. के. प्रसाद यांना पाठविले आहे. या मेट्रो रेल्वेसाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी पन्नास टक्के रकमेएवढे कर्ज महापालिका जागतिक बँकेकडून घेणार आहे. तथापि, महापालिकेची सद्य:स्थिती व कारभाराची पद्धती विचारात घेता मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव हा ‘शेखचिल्ली’च्या स्वप्नाची आठवण करून देणारा असल्याची उपहासात्मक प्रतिक्रिया सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.