गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी राज्य परिवहन सेवेने जादा बस गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला असून २३ ते २९ ऑगस्ट या कालावधीत ही सुविधा गणेशभक्तांना मिळणार आहे. तसेच परतीचे आरक्षण ४ ते ९ सप्टेंबर या कालावधीत करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 ठाणे मध्यवर्ती बस स्थानक, बोरीवली नॅन्सी कॉलनी बसस्थानक, मुलुंड (पू), भांडुप (प), विठ्ठलवाडी, भाइंदर, कल्याण आदी ठिकाणांहून जादा बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी २३ जुलैपासून संगणकीय, तसेच हस्तलिखित पद्धतीने आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रुप पद्धतीचे आरक्षण १५ जुलैपासून ठाणे आगार क्र. १ आणि २, कल्याण, विठ्ठलवाडी या आगारातून मिळणार आहे. खासगी अभिकर्त्यांमार्फतही आरक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य परिवहन सेवेच्या ठाणे विभागाने कळविले आहे.