‘हुतात्मा जयवंतराव पाटील’ची विक्री सूर्यकांता पाटील यांच्या संमतीनेच झाली, असे सांगत त्यांनी केलेल्या आरोपांना ‘भाऊराव चव्हाण’चे अध्यक्ष गणपतराव तिडके यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले.
नांदेड जिल्हा बँकेचे ३३ कोटी बुडवणाऱ्या हुतात्मा जयवंतराव पाटील साखर कारखान्यावर सन २०१०मध्ये राज्य सहकारी बँकेच्या कारवाईस सामोरे जाण्याचा प्रसंग आला, तेव्हा कारखान्याच्या तत्कालीन अध्यक्ष सूर्यकांता पाटील यांनीच ‘सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्ट’ खालील कारवाईचा मार्ग बँकेला खुला करून दिला. हुतात्मा पाटील कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक दत्ता शिंदे यांनी ३० डिसेंबर २०१० रोजी ही बाब राज्य बँकेच्या सहव्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रातून समोर आली. त्या वेळी कारखान्यावर एकटय़ा राज्य बँकेचे ७८ कोटी २५ लाख कर्ज होते. तत्पूर्वी बँकेने कारखान्याला कर्जाची परतफेड करण्यासाठी आवश्यक ती मुदत व संधी दिली होती. असे असतानाही पाटील यांनी कारखान्याची विक्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य बँकेसोबतच भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यावर निशाणा साधला. बँकेने त्यांच्या आरोपाला थेट उत्तर दिले नाही. पण उपलब्ध झालेल्या पत्रावरून पाटील यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाने ४ डिसेंबर २०१० रोजी केलेल्या ठरावानुसारच बँकेने ‘सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्ट’अंतर्गत पुढील कारवाई केली. स्पष्ट शब्दांत सांगायचे झाल्यास ‘हुतात्मा पाटील’ची विक्री पाटील यांच्या संमतीनेच झाली. त्यांनी केलेल्या आरोपांना ‘भाऊराव चव्हाण’चे अध्यक्ष गणपतराव तिडके यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले.
तिडके यांचे पत्रक
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना व या कारखान्याशी संलग्न अन्य कारखान्यांच्या आर्थिक व्यवहारांबद्दल ‘जासूसीछाप’ विधाने करणाऱ्या सूर्यकांता पाटील यांनी त्यांच्या कारखान्यावर राज्य बँकेसह अन्य वित्तीय संस्थांचे १०० कोटींहून अधिक रकमेचे कर्ज कसे काय झाले, याचा हिशेब कारखान्याच्या ऊसउत्पादक सभासदांना आधी द्यावा, असे ‘भाऊराव चव्हाण’चे अध्यक्ष तिडके यांनी पत्रकात म्हटले आहे. पाटील यांनी स्थापन केलेला हुतात्मा पाटील सहकारी साखर कारखाना भाऊराव चव्हाण कारखान्याने विकत घेतला. राज्य बँकेच्या माध्यमातून गेल्या आठवडय़ात खरेदी-विक्रीची प्रक्रिया पूर्ण केली. त्या वेळी व नंतर मौन धारण करणाऱ्या सूर्यकांता पाटील यांनी काही वृत्तपत्रांमधून केलेल्या वक्तव्याचा भाऊराव चव्हाण कारखान्याने समाचार घेतला.
भाऊराव चव्हाण साखर कारखान्यावर १७० कोटींचे कर्ज असताना हुतात्मा पाटील कारखाना खरेदी करण्यासाठी ४८ कोटी कोठून आले, असा सवाल पाटील यांनी केला होता. पण त्यांचे हे वक्तव्य धादांत खोटे आहे. भाऊराव चव्हाण कारखाना, या कारखान्याचा आसवनी प्रकल्प तसेच डोंगरकडय़ाचा साखर कारखाना विकत घेण्यासाठी घेतलेल्या खर्चाची परतफेड झाली असून शंकर (वाघलवाडा)साठी घेतलेल्या कर्जाची नियमित फेड सुरू आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
कर्जबाजारी कोण, हे सबंध जिल्हय़ाला ‘हुतात्मा पाटील’च्या विक्री प्रक्रियेनंतर कळाले, असे नमूद करून तिडके म्हणाले, की ‘सूर्यकांताबाईंनी कारखान्यासाठी राज्य बँकेकडून घेतलेले कर्ज ७८ कोटींवर जाऊन थकीत झाले. जिल्हा बँकेकडून घेतलेल्या ४ कोटींचे ३३ कोटी झाले. मुंबै बँकेकडूनही त्यांनी कर्ज घेऊन थकवलेल्या, स्वत: कर्जबाजारी असताना दुसऱ्यांना कर्जबाजारी म्हणणे म्हणजे मूर्खाच्या नंदनवनात वावरण्याचा प्रकार होय, असा टोला त्यांनी लगावला.
भाऊराव चव्हाणने रीतसर, तसेच कायदेशीर मार्गाने बंद पडलेला साखर कारखाना नव्याने सुरू करण्यासाठी विकत घेतला. त्यामागे हदगाव-हिमायतनगर भागातील ऊस उत्पादकांना दिलासा देण्याचा, त्यांची आर्थिक उन्नती करण्याचा हेतू असल्याचे तिडके यांनी स्पष्ट केले. वरील कारखाना आम्हालाच द्यावा, अशी सक्ती आम्ही राज्य बँक किंवा सरकारवर केली नव्हती, हेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी तिडके यांनी सन २०१०मध्ये हुतात्मा जयवंतराव पाटील साखर कारखान्याने राज्य बँकेला पाठविलेल्या पत्राची प्रतच समोर ठेवली.