गुन्हेगारी, टोळीयुद्ध, हत्यांमागून हत्या करण्यामागची कारणे, परिणाम अशा एका हत्येच्या गुन्ह्य़ाशी संबंधित अनेक पैलू दाखविण्याचा चांगला प्रयत्न यापूर्वी राम गोपाल वर्मा यांनी केला आहे. सत्या या चित्रपटातून दाखविलेल्या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात असताना त्याचा सीक्वेल म्हणून ‘सत्या २’ मध्ये व्यक्तिरेखांचे लिखाण, पात्रनिवड आणि चित्रण या तीनही बाबतीत दिग्दर्शक कमालीचा कमी पडला आहे, इतका की प्रेक्षकांवरच रामू नाम ‘सत्या’ है म्हणण्याची वेळ यावी!
‘सत्या’सारख्या चित्रपटांतील गुन्हेगारांच्या अनेक व्यक्तिरेखा वास्तवात असतीलच कुठे तरी असे प्रेक्षकाला वाटावे इतक्या त्या भिडतात. परंतु मूळ चित्रपटातील एकही व्यक्तिरेखा, घटना-प्रसंग, त्यांचे चित्रण याची पुनरावृत्ती नव्हे पण काही नेमके बदल दाखवीत नूतनीकरण करूनही चांगला सीक्वेल बनविता आला असता, परंतु दिग्दर्शकाला पूर्णपणे  नवा सीक्वेल तयार करायचा असल्यामुळे नवोदित कलावंतांना घेऊन त्याने हा चित्रपट केला आहे. अनोळखी, नवोदित कलावंत असूनही त्यांच्या निर्विकार, सरधोपट अभिनयामुळे चित्रपटाचा अपेक्षित परिणाम साधणे अशक्य होऊन बसते.
सत्या हा एक सनकी तरुण मुंबईत एका मित्राच्या घरी राहायला येतो. अबोल, सदान्कदा निर्विकार भाव ठेवून वागणारा हा सत्या आपला भूतकाळ, आपल्या आवडीनिवडी, आपला जगण्याचा उद्देश सर्वापासून लपवून ठेवतो. नव्यानेच मुंबईत आलेल्या एका तरुणाला लगेचच एका बडय़ा बिल्डरकडे नोकरी मिळते, इथपासूनच पटकथेतील कच्चे दुवे सहजपणे लक्षात येतात. आपली खरी ओळख लपूवन सत्या एक कंपनी स्थापन करतो. निनावी कंपनीद्वारे सर्वसामान्य जनतेचा ‘मसिहा’ बनून तो मुंबई शहराचा पोलीस आयुक्त, एक माध्यमसम्राट, एक बडा उद्योगपती यांची हत्या करवतो. सगळीकडे त्याची चर्चा होते. लाहोटी बिल्डर आणि त्याच्या साथीदारांकडून पैसे घेऊन तो एक अदृश्य कंपनी सुरू करतो. या कंपनीतील माणसे सत्या सांगेल ते काम चोख बजावतात. पोलीस कंपनीचा माग काढायचा प्रयत्न करतात.
एका प्रसंगात एक बुरखाधारी महिला एका गुंडाचा ड्रिल मशीनच्या मदतीने भर दिवसा खून करते आणि तिच्या तोंडावर आणि अन्यत्र सर्व ठिकाणी रक्त उडते असे दाखविले आहे. धक्कादायक प्रसंगाचे चित्रण अतिशय भडक पद्धतीने करताना प्रेक्षकाला केवळ धक्का देणे, हत्येचा थरार दाखविणे एवढय़ाच उद्देशाने सिनेमा बनविलाय की काय ते प्रेक्षकाला समजत नाही.
अदृश्य शक्तीप्रमाणे सत्या अदृश्य कंपनी चालवितो. परंतु पहिल्या तीन हत्या करताना त्याची हत्या करण्याची पद्धत काय आहे, त्याचे लक्ष्य असलेल्या व्यक्तींवर आधी नजर ठेवून मग तो हत्या करतो किंवा कसे हे सगळे दिग्दर्शकाने अदृश्यच ठेवले आहे. त्यामुळे थेट हत्या होताना प्रेक्षक पाहतो आणि लाहोटी व त्याचे साथीदार एका बंद खोलीत बसून आनंदोत्सव काय साजरा करतात. कथानक आणि चित्रणातील असंख्य कच्चे दुवे गेले कुठे याचा विचार प्रेक्षक करीत बसतो. तर्कविसंगत पद्धतीने संबंध चित्रपट सुरू राहतो.
सत्याचा मित्र नारा, या नाराच्या प्रेयसीचे नाव ‘स्पेशल’ आहे. तिच्या नावामागे म्हणे ‘लंबी कहानी’ असते. पटकथेत तिला फारसे महत्त्व नसतानाही म्हणजेच काहीही स्पेशल नसलेल्या या व्यक्तिरेखेचे नाव असे का ठेवण्यात आले आहे, याचे कोडे प्रेक्षकाला चित्रपट संपून गेला तरी उलगडत नाही. गुन्हेगारी विश्वात डॉन बनू पाहणारा सत्या आपल्या प्रेयसीलाही आपण काय करतो, पैसे कसे कमावतो हे सांगत नाही.
संशयास्पद हालचाली असलेल्या व्यक्तींना पोलीस हटकतात. पण या चित्रपटातील नायकाला सहजपणे एका मोठय़ा बिल्डरकडे हत्येची सुपारी घेण्याची नोकरी मिळते, त्याच्यावर कधीच कुणाला संशय येत नाही. हा सगळा दिग्दर्शकाच्या डोक्यातील कल्पना प्रेक्षकांच्या माथी मारण्याचा प्रकार या चित्रपटात करण्यात आला आहे. सगळ्यात कहर केला आहे तो प्रमुख कलावंतांनी. सत्याच्या भूमिकेतील पुनीतसिंग रत्न हा नवोदित अभिनेता संबंध चित्रपटभर निर्विकार पद्धतीने वावरतो, संवादफेक, मूकअभिनय या सर्व बाबतीत तो नवोदित आहे. संबंध चित्रपटात एकाच प्रकारची देहबोली, मख्ख चेहरा दाखवीत तो पडद्यावर आला की प्रेक्षक न कंटाळला तरच नवल. अन्य सर्व प्रमुख व्यक्तिरेखांचा अभिनय सुमार दर्जाचा असल्यामुळे चित्रपट प्रेक्षकावर परिणाम करण्यात सपशेल अपयशी ठरतो. वास्तविक व्यवस्थेविरुद्ध लढणारा ‘अ‍ॅण्टी हीरो’ दिग्दर्शकाला दाखवायचा होता, परंतु तो दाखविताना तर्कविसंगत घटनांची मालिका दाखविल्यामुळे दिग्दर्शक अपयशी ठरतो. भयंकर संगीत आणि कसलाच आगापिछा नसलेल्या व्यक्तिरेखा यामुळे  प्रेक्षकांची करमणूक करण्यात चित्रपट फसतो.
सत्या २
निर्माता – एम. सुमंत कुमार रेड्डी, दिग्दर्शक – राम गोपाल वर्मा, लेखक – राधिका आनंद, कॅरी अरोरा, छायालेखक – विकाश सराफ, संगीत – अमर मोहिले, नितीन राईकवार, दर्शन राठोड, संजीव राठोड
संकलन – प्रताप कुमार संगा, कलावंत – पुनीतसिंग रतन, अनायका सोती, महेश ठाकूर, मृणाल जैन, अमित्रियान, आरधना गुप्ता, राज प्रेमी, अमल सेहरावत, विक्रम सिंग व अन्य.