आपल्या भाषा ज्ञानभाषेबरोबरच विज्ञान भाषा आहेत. त्यामुळे भारतीय भाषेतून विज्ञानाचा अभ्यास केला जाऊ शकतो का, याचा विचार झाला पाहिजे, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी येथे व्यक्त केले. विज्ञान जगजागृती शिबीर-२०१२ निमित्त शिवाजी शिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. भटकर बोलत होते. पाच दिवसांच्या ‘इस्पायर’ या विज्ञान जनजागृती शिबिरात ते बोलत होते. व्यासपीठावर शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अरुणकुमार शेळके, डॉ. आर.बी. ठाकरे, डॉ. टी.सी. पंडा, प्राचार्य डॉ. डी.के. बुरघाटे, अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. देशमुख आदी होते.
डॉ. भटकर म्हणाले, आपल्या भाषा प्रगल्भ आहेत. त्यांचे उगमस्थान, साहित्य आणि ज्ञान मोठे आहे. मग भारतीय भाषेतून विज्ञान शिकू शकतो काय असा प्रश्न आहे. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. एकूण २२ राजमान्य भाषा आहेत आणि १० लिपीत त्या लिहिल्या जातात. या भाषा ज्ञानभाषेबरोबरच त्या विज्ञानाच्या भाषा आहेत. एकाचवेळी अनेक भाषांचे मिश्रण असलेली ‘एसएमएस’ ही लघुलिपी सर्वात जास्त संख्येने जगभरात बोलली जाते. आता भरमसाठ महाविद्यालये असून वर्षांला २२ लाख विद्यार्थी अभियांत्रिकीची पदवी, पदविका अभ्यासक्रम शिकवतात. एवढय़ा मोठय़ा संख्येने अभियंता निर्माण करूनही आपण नैसर्गिक विज्ञानाकडे तरुणांना वळवण्यास अपयशी ठरलो आहोत, अशी खंत भटकर यांनी व्यक्त केली.
गणित, सांख्यिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सागर विज्ञान इत्यादी नैसर्गिक विज्ञाने आहेत. नैसर्गिक विज्ञानाशिवाय अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान थिटे आहे. रामानुज, सी.व्ही. रामन, भटनागर आदी शास्त्रज्ञ हे नैसर्गिक विज्ञानातून पुढे आले आहेत. ‘इन्स्पायर’च्या माध्यमातून केंद्र शासनाने उदयोन्मुख शास्त्रज्ञ घडवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकले असून मनमोहन सिंग यांनी २१ वे दशक हे अन्वेषण दशक म्हणून घोषित केले आहे. समाज आणि देशाच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी तंत्रज्ञानाचा वापर हेच ‘इस्पायर’च्या माध्यमातून शासनाला अपेक्षित आहे. कार्यक्रमात दोन मिनिटांचा वेळ मागून डॉ. वासुदेव राहुडकर म्हणाले, नैसर्गिक विज्ञानामध्ये कृषी शास्त्राचाही अंतर्भाव असणे गरजेचे आहे. डॉ. पंजाबराव देशमुखांना तेच अपेक्षित आहे. हजारो वर्षे जमिनीची सुपिकता येथील शेतकऱ्यांनी टिकवली. मात्र, गेल्या काही वर्षांत आधुनिक रासायनिक खतांच्या वापरामुळे जमीन नापिक झाली. आम्ही पाश्चात्त्यांचे दाखले देऊन स्वत:चे म्हणणे मांडतो. मात्र, आमच्या ऋषीमुनींनी केलेल्या महत्त्वपूर्ण कामांची माहिती देत नाही. कारण आमची संशोधने, चांगल्या गोष्टी आम्हालाच माहिती नसतात. शेतकऱ्यांच्या भरवशावर आपली सर्व प्रगती आहे, असे मत राहुडकर यांनी नोंदवले. आजच्या परिस्थितीवर परखड भाष्य करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष अ‍ॅड. अरुणकुमार शेळके म्हणाले, आमच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला नाही, हे भारताचे दुर्दैव आहे. आम्ही केवळ रेडिमेड उत्तरे पाठ करून गुण प्राप्त करतो आणि पद, प्रतिष्ठा आणि पैशाच्या मागे लागतो. त्यासाठी महत्त्वाकांक्षा आणि स्पर्धेचे विष लहानपणापासूनच पालक मुलांच्या मनात पेरीत असतात. पाठांतर आणि स्मृतीवर भर देऊन बुद्धिमत्तेची प्रतारणा करतो. म्हणूनच आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टी असलेले शास्त्रज्ञ निर्माण होत नाहीत. प्रास्ताविक डॉ. ए.एम. बंड यांनी केले. एस.जी. बेदी यांनी आभार मानले.