मुंबईच्या रस्त्यांवरून रात्री घरी जाताना सर्वात जास्त भीती कशाची असेल तर ती कुत्र्यांची. गेली सुमारे २० वर्षे पालिकेने कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला असला तरी कुत्र्यांविरोधातील तक्रारी वाढतच आहेत. त्यामुळे शहरात नेमकी किती कुत्री आहेत व किती कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले आहे, त्याची माहिती मिळवण्यासाठी कुत्र्यांची गणना सुरू करण्यात आली आहे.
कुत्र्यांची गणना करण्याचे काम किमान ४-५ आठवडे सुरू राहील. रोज सकाळी ६ ते ९ या काळात ही गणना केली जाणार आहे. रस्त्यांवर त्यानंतर वाहनांची गर्दी होत असल्याने ही सोयीची वेळ निवडली गेली आहे. हे काम हाती घेतलेल्या ‘ह्यूमन सोसायटी इंटरनॅशनल’या संस्थेच्या सदस्यांना प्रत्येक वॉर्डमधील ३० ते ३५ किलोमीटर रस्त्याचा परिसर विभागून देण्यात आला आहे. प्रत्येक विभागात तीन दिवस कुत्र्यांचा शोध घेऊन नोंदणी केली जाईल. त्यासाठी खास मोबाइल अ‍ॅप्सही तयार करण्यात आले आहे. नर, मादी, पिले, पिलांसह मादी, निर्बिजीकरण केलेले कुत्रे यांची नोंद होईल. त्याचप्रमाणे अशक्त, गलेलठ्ठ कुत्रे तसेच त्यांच्या त्वचेवरूनही नोंदणी केली जाईल. काही ठिकाणी कुत्र्यांचा माग ठेवण्यासाठी छायाचित्रांचीही मदत घेतली जाईल, अशी माहिती संस्थेचे सदस्य अमित चौधरी यांनी दिली.  
कुत्र्यांची संख्या व त्यांच्याविषयीच्या तक्रारी वाढल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने १९९४ पासून निर्बिजीकरणाचा वादग्रस्त ठरलेला कार्यक्रम हाती घेतला. त्यानुसार आतापर्यंत दोन लाखांहून अधिक कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले असल्याचे पालिकेकडून अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे. मात्र तरीही नागरिकांच्या तक्रारीत वाढ झाली आहे. त्यातही दहा वर्षांपूर्वीपेक्षा आता तक्रारीत वाढ झाली असल्याचे पालिकेचे अधिकारी सांगतात.
निर्बिजीकरणाच्या कार्यक्रमाला नेमके किती यश आले आहे आणि त्यामुळे कुत्र्यांच्या तक्रारींवर परिणाम झाला आहे का याची माहिती मिळवण्यासाठी कुत्र्यांची प्रगणना आवश्यक ठरते. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तसेच केंद्र सरकारने २००१ मध्ये अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल नियमांनुसारही दर पाच वर्षांनी कुत्र्यांची प्रगणना करावी लागते. २००७-०८ या कालावधीत कुत्र्यांची गणना करण्यात आली होती. त्यावेळी शहरात ७६००० कुत्रे आढळले होते व त्यातील २६,९०० पाळीव कुत्रे होते. त्यावेळी केवळ ४,२०४ कुत्र्यांसाठी पालिकेकडून परवाने घेण्यात आले होते. मात्र नागरिकांच्या तक्रारींची संख्या पाहता या आकडेवारीबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली होती.