चाकोरीबद्ध रुढी, परंपरा झुगारून प्रवाहाविरुद्ध जात, राजर्षी शाहूमहाराजांनी देशाला दिशा देण्याचे कार्य करून सामाजिक व्यवस्थेत बदल केले. याची माहिती भावी पिढीला करून देणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंके यांनी व्यक्त केले.
येथील शारदा महाविद्यालयात सुरू असलेल्या ‘राजर्षी शाहूमहाराजांच्या विचारांचे एकविसाव्या शतकातील महत्त्व’ या विषयावरील चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी डॉ. साळुंके बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. टी. मुलगीर उपस्थित होते. डॉ. साळुंके म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी आपले आयुष्य वेचणारे राजर्षी शाहूमहाराज हे एकमेव संस्थानिक होते. राजेशाहीचे सुख न भोगता संघर्ष करीत सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी ते अविरत झटले. साहसी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या शाहूमहाराजांनी व्यवस्थेत बदल करताना संवेदनशीलता बाळगली. सामान्यांच्या दु:खाच्या बाबतीत संवेदनशीलता हा त्यांचा महत्त्वाचा भाग होता. संमती वयाचा कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा, सक्तीच्या शिक्षणाचा कायदा असे तत्कालीन परंपरेला झुगारणारे कायदे करून शाहूमहाराज संपूर्ण देशासाठी दिशा देणारे व्यक्तिमत्त्व ठरले. अस्पृश्यतेची झळ महाराजांनाही वेदोक्त प्रकरणाच्या वेळी बसली, तरीही कायद्याला अधिकृत करण्यासाठी त्यांनी क्षत्रीय म्हणून राज्याभिषेक केला. यातच त्यांची दूरदृष्टी व चातुर्य दिसून येते.
महाराजांचे शिक्षण, अर्थशास्त्र, प्रशासन या विषयावरील विचार परिवर्तनवादी होते. परिवर्तनाच्या चळवळीत लोकांना पर्याय उपलब्ध करून देऊन महाराजांनी सर्वच क्षेत्रात बदल केले. सध्याच्या व भावी पिढीलाही त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, तसेच महाराजांचे विचार अंगीकारावे या साठी सातत्याने चर्चासत्राच्या माध्यमातून ते विचार मांडले गेले पाहिजेत, असेही डॉ. सांळुके यांनी सांगितले. चर्चासत्राचे संयोजक डॉ. एस. पी. वाघमारे उपस्थित होते.