राजकारणाबद्दलची चीड, कष्टकऱ्यांसह आई-वडिलांविषयीचा नितांत आदर, हे सारेच रामदास वाघ यांच्या बाराही पुस्तकांमधील मर्म असून ते सर्वाधिक भावले, अशा शब्दात ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कापडणे येथे अहिराणी साहित्यिक रामदास वाघ यांनी लिहिलेल्या बारा अहिराणी पुस्तकांचा प्रकाशन सोहळा १२-१२-१२ चा मुहूर्त साधून करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. म. सू. पगारे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्राचार्य सदाशिव माळी, प्रा. डॉ. न. म. जैन, अ‍ॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. कृष्णा पोतदार, कृष्णा पाटील, गो. पि. लांडगे, प्रा. वा. ना. आंधळे, खलिल देशमुख, श्रीपाद नांदेडकर व प्रा. बी. एन. चौधरी यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्यात सावली, म्हातारपणनी काठी, शेतकरी एक जीवन कैदी, सत्यमेव जयते, याले जीवन आसं नाव, तूना काय बापनं जास, वानगी, माय नावाना देव, खरंसे खोट सांगावू नही, वास्तव व अवास्तव, व्याख्यान व एक बिघा जमीन या पुस्तकांचा समावेश आहे.
खान्देश, मराठवाडाचा काही पट्टा व नाशिक जिल्ह्यातून ३३ लोकप्रतिनिधी विधान सभेत पोहोचले. अहिराणी भागातील हे सर्व लोकप्रतिनिधी विधानसभेत अहिराणीला चांगला दर्जा देवू शकत नसल्याबद्दल पाटील यांनी खंत व्यक्त केली. याच भाषेने आपल्याला तीनवेळा आमदार केल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. अहिराणीचा बारकाईने अभ्यास केला तर तिची शुद्ध बीजे नेपाळी भाषेत आढळतात, असेही ते म्हणाले.
अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी वाघ यांच्या साहित्यात विद्रोह आढळत असल्याचे नमूद केले. त्यांनी खेडय़ातील माणूस उभा केला. यावेळी लेखक वाघ यांनी आपले जीवन घडण्यामागे गाव आणि आई-वडिलांचे योगदान असल्याचे सांगितले.
 नितीन पाटील यांनी परिचय करून दिला. प्रा. रवींद्र पाटील यांनी प्रास्तविक केले तर सुनील वाघ यांनी सूत्रसंचलन केले.