तुळजाभवानी मंदिराला पुरातन झळाळी मिळवून द्यावी म्हणून मंदिरातील फरशी उखडून तेथे घडविलेले दगड बसविण्याचे काम धिम्या गतीने सुरू आहे. नवरात्र केवळ ५ दिवसांवर येऊन ठेपले असले तरी मंदिर परिसरातील दगडी फरशी बसविण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ठेकेदाराला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप प्रशासनावर होत आहे. तुळजापूर येथे नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. ५ ऑक्टोबर २०१३ रोजी घटस्थापना होणार असून नवरात्राला सुरुवात होईल. आंध्र प्रदेश, कर्नाटक व राज्यातील विविध जिल्हय़ांतून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनाला येत असतात. मंदिरात पाय ठेवायला जागा राहात नाही. मंदिरातील पायाभूत सुविधा विकासाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना वारंवार देऊनही ठेकेदारांवर फारसा परिणाम झाल्या नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मंदिर परिसरात दगडी फरशी बसविण्याचे काम बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेले आहे. मोजके आठच कर्मचारी हे काम करीत असतात. फरशी बसविण्याचे काम तसे किचकट आहे. नवरात्रीपूर्वी ते काम पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे. सुमारे २५ ते ३० फुटांचे काम अद्याप अपूर्ण आहे. दगडी फरशी बसविणे हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री मधुकर चव्हाण व तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी हाती घेतलेला महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या महत्त्वपूर्ण कामाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे ठेकेदारांनीही फरशी बसविण्याचे काम गतीने केले नाही. मंदिरातील फरशी उखडून टाकल्याने भाविकांना नव्याच त्रासाला सामोरे जावे लागते. पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे.