‘इंडियन एअरोबायोलॉजी सोसायटी’च्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
‘अभ्यासक्रम तयार करताना आंतरशास्त्रीय दृष्टिकोन ठेवणे हे शिक्षणतज्ज्ञांसमोरचे आव्हान आहे’, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ विजय भटकर यांनी व्यक्त केले. ‘इंडियन एअरोबायोलॉजी सोसायटी’ च्या सतराव्या राष्ट्रीय परिषदेचे गुरूवारी भटकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
तीन दिवसांच्या या परिषदेत ‘इम्पॅक्ट ऑफ एअरबॉर्न माईक्रोब्ज’ या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.
या वेळी ज्येष्ठ वायूजीवशास्त्रज्ञ डॉ. एस. टी. टिळक आणि डॉ. सुनिर्मल चंदा यांना भटकर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. परिषदेत डॉ. एस. एन. आगाशे ‘टी. श्रीरामालु स्मृती व्याख्यान’ देणार आहेत. यानिमित्त आगाशे यांचा भटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा’चे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, ‘माईर्स एमआयटी’चे संस्थापक विश्वनाथ कराड, ‘इंडियन एअरोबायोलॉजिकल सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. टी. एन. मोरे, ‘माईर्स महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी’चे प्राचार्य डॉ. बी. एस. कुचेकर या वेळी उपस्थित होते.
भटकर म्हणाले, ‘‘अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना जैविक शास्त्रांचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जैविक शास्त्रांच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीशी निगडित विषयांचे शिक्षण घेणेही सक्तीचे असायला हवे. अशा प्रकारचा आंतरशास्त्रीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अभ्यासक्रमांची आखणी करणे हे शिक्षणतज्ज्ञांसमोरचे आव्हान आहे. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.’’
‘एअरोबायोलॉजी’ अर्थात वायूजीवशास्त्र ही जीवशास्त्राचीच एक शाखा असून यात हवेतील सूक्ष्मजीवांच्या अभ्यासाचा समावेश होतो.