शहराच्या गारखेडा परिसरात गुरुवारी रात्री उशिरा सुमारे ५०-५५जणांच्या जमावाने केलेल्या जोरदार दगडफेकीत तेथे तैनातीस असलेले तीन पोलीस जबर जखमी झाले. मुकुंदवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला. घटना घडली त्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी शुक्रवापर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती. सर्व आरोपी फरारी आहेत.
गारखेडा परिसरातील भारतनगर येथे डॉ. पैठणे यांच्या घरासमोरील चौकात गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास मोठय़ा संख्येने जमलेल्या जमावाने ही दगडफेक केली. यात फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल विष्णू भाऊसाहेब लिपाणे (बक्कल नंबर १०५, मुकुंदवाडी पोलीस ठाणे) यांच्यासह याच पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर साहेबराव गदई (बक्कल नंबर २४४) व विजयसिंग पमनावत (बक्कल नंबर १७५७) जखमी झाले. जोरदार दगडफेक व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी ५०-५५जणांविरुद्ध गुन्ह्य़ाची नोंद केली. आरोपींची नावे अशी : मुख्तार पटेल, वसीम पटेल, विकास उर्भ विकी उगळे, मुश्ताक (पूर्ण नाव समजले नाही), युनूस पटेल, कयूम पटेल, अयूब पटेल, रईस पटेल, कलीम पटेल, खाजा पटेल, गनी पटेल, हमीद पटेल व अन्य ३०-४०जण (सर्व देवळाई, तालुका व जिल्हा औरंगाबाद).
दगडफेकीच्या प्रकाराबाबत पोलिसांनी सांगितले की, गारखेडा परिसरात भारतनगर येथे डॉ. पैठणे यांच्या घरासमोर असलेल्या चौकात गुरुवारी रात्री आरोपींनी व त्यांच्याबरोबर मोठय़ा संख्येने असलेल्या अनोळखी लोकांनी ईब मुबारक, भगवा झेंडा लावून तसेच नवीन खड्डे खोदण्याच्या कारणावरून दोन विशिष्ट समाजातींल लोकांशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वेळी गैरकायद्याची मंडळी जमवून वाद वाढविणाऱ्या लोकांना पोलीस व त्यांच्यासह असलेले साक्षीदार शांत राहण्याबाबत समजावून सांगत होते. परंतु जमाव ऐकून घेत नव्हता. उलट त्यांनी पोलिसांना तेथून हुसकावण्यास प्रारंभ केला. या दरम्यान जमावातील लोकांनी जोरदार दगडफेक सुरू केली. या प्रकारानंतर मोठी पळापळ झाली. दगडफेकीत तीन पोलीस कर्मचारी जबर जखमी झाले. यातील काहींचे डोके फुटले, तर काहींना हात फ्रॅक्चर करून गंभीर जखमी करण्यात आले. जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होती. आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आले असले, तरी अजून कोणालाही अटक झाली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पोलिसांनी आरोपींची घरे पिंजून काढली. परंतु कोणीही मिळाले नाही. रात्रीच्या प्रकारानंतर शुक्रवारी या परिसरात तणावपूर्ण शांतता होती. सशस्त्र पोलीस बंदोबस्तही तैनात होता.