मोशी-आळंदी रस्त्यावरील समर्थ फेज येथे भूमिगत पाण्याच्या टाकीत पडून एका दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.
तुषार बालाजी माळी (वय दोन वर्षे, रा. मूळ- ढोकी, जि. उस्मानाबाद) असे मृत्यू झालेल्या बालाकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळी कुटुंबीय मोशी-आळंदी रस्त्यावरील समर्थ फेज येथील तळमजल्यावर राहतात. या इमारतीमध्ये बालाजी माळी हे बिगारी काम करतात. बुधवारी सकाळी तुषारची आई कपडे धुण्यासाठी शेजारीच असलेल्या पाण्याच्या टाकीकडे गेल्या. त्यांनी भूमिगत असलेल्या टाकीचे झाकन काढून पाणी घेतले. मात्र, टाकीचे झाकण लावले नाही. कपडे धुताना तुषार जवळच खेळत होता. कपडे धुवून वाळत घाल्ण्यासाठी त्या गेल्या आणि परत येऊन पाहिले असता तुषार त्या ठिकाणी खेळताना दिसून आला नाही. त्यांना तुषार पाण्याच्या टाकीत पडल्याचे दिसून आले. त्यांनी आरडा-ओरडा केल्यानंतर नागरिकांनी तुषारला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढले. तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तुषारचा मृत्यू झाला.