गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत महाराष्ट्रातील पाण्याचा साठा कमी झाला असून येत्या काही दिवसांमध्ये पाण्याच्या दुर्भिक्षाचा गंभीर प्रश्न उद्भवू शकेल, अशी धोक्याची सूचना शासनाच्या आकडेवारीवरून मिळाली आहे. राज्यात आजही पाण्याची टंचाई कायम असून पाणी पुरवठय़ासाठी टँकर्सच्या संख्येत वाढ झाली आहे.
राज्यातील एकूण ७८२ गावे आणि ३,५५६ वाडय़ांमधून १,१२७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावरूनच आगामी काळ पाणी टंचाईचे भीषण रूप धारण करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गतवर्षी याच सुमारास ४० गावे आणि  १०७ वाडय़ांमधून ३५ टँकर्स सुरू होते. गावे, वाडय़ा आणि टँकर्सच्या संख्येत अनेक पटीने वाढ झाली आहे. चालू वर्षी नाशिक विभागात २२३ गावे, पुणे विभागात ३८५, औरंगाबाद विभागात १६३ आणि अमरावती विभागात ११ गावांमध्ये टँकर्सने पाणी पुरवठा केला जात आहे. याशिवाय राज्यातील मोठय़ा, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पात आतापर्यंत २३ हजार २२८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात पाण्याची एकूण टक्केवारी ६१ एवढी आहे. गेल्यावर्षी याच सुमारास पाण्याचा साठा ७४ टक्के होता तर २०१०मध्ये साठा ८२ टक्के एवढा होता. राज्यातील कोकण विभागातील जलसाठा ८६ टक्के म्हणजे सर्वात जास्त आहे. मराठवाडय़ात सर्वात कमी म्हणजे केवळ मराठवाडा २० टक्के आहे. नागपूर विभागात ६७ टक्के, अमरावतीत ७१ टक्के, नाशिकमध्ये ५९ टक्के आणि पुण्यात ६८ टक्के जलसाठा आहे.