माळशिरस तालुक्यातील दहिगाव शिवारात परप्रांतीय कामगारांमध्ये पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बंटू शिवशरणसिंग यादव (वय २५) या तरूणाचा खून करण्यात आला. नंतर तो मृतदेह ४४ फाटा उजव्या कालव्यातील पाण्यात टाकून देऊन गुन्ह्य़ाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी अनिल भगतराम पाल यास अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील फिरोजाबादचा रहिवासी अससेला मृत बंटू यादव व आरोपी अनिल पाल (रा. इटावा, उत्तर प्रदेश) हे दोघे माळशिरस तालुक्यात काम करीत होते. त्यांच्यात पूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्यातूनच अनिल याने बंटू याच्या डोक्यात हत्याराने प्रहार केला. नंतर तो मृतदेह ४४ फाटा उजव्या कालव्यातील पाण्यात टाकून दिला. नातेपुते पोलिसांना सदर मृतदेह बेवारस स्थितीत सापडला. सुरूवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद करून पोलिसांनी तपास केला असता हा खुनाचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले. हा खून अनिल पाल याने केल्याचे दिसून आल्याने त्यास अटक करण्यात आली आहे.