रामचरण तेजा आजच्या घडीचा दाक्षिणात्य सुपरस्टार. अमिताभ बच्चनच्या यांच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरलेल्या ‘जंजीर’ चित्रपटातील इन्स्पेक्टर विजयची भूमिका रिमेकमध्ये कोणी केली असती? अभिषेक बच्चन की ह्रतिक रोशन? नाहीतरी ‘अग्निपथ’च्या रिमेकमध्ये ह्रतिक अगदी चपखल बसला होता आणि चित्रपटाने तिकीटबारीवर चांगले यशही मिळवले. पण, हिंदीतील प्रथितयश आणि नवोदित अशा सगळ्याच कलाकरांना फाटा देऊन दिग्दर्शक अपूर्व लाखियाने जेव्हा रामचरण तेजाचे नाव जाहीर केले तेव्हा अवघ्या बॉलिवूडच्या भुवया उंचावल्या. पण, अपूर्व स्वत:च्या निवडीवर ठाम होता. रामचरणच्या निवडीमागे अपूर्वचे नेमके काय कारण होते? ‘जंजीर’ हिट झाला तर रामचरण बॉलिवूडमध्ये रूळेल? धनुषने पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये प्रवेश करून ‘रांझना’ला यश मिळवून दिले त्यामुळे दाक्षिणात्य अभिनेत्याला हिंदीतला प्रेक्षकही स्वीकारतोय, ही तिथल्या कलाकारांसाठी समाधानाची बाब ठरली आहे. आणि तरीही स्वत: रामचरणला याबद्दल काय वाटतेय..
‘अपूर्वने मला ही भूमिका देताना काय विचार केला होता, हेच मला समजत नाही. म्हणजे आता या घडीला तर तो विचारही करावासा वाटत नाही. मी या चित्रपटाला होकार देण्यामागे एकच कारण होतं ते म्हणजे अपूर्वने मला जी पटकथा दिली होती ती अतिशय सुंदर आणि सशक्त होती. तुम्हाला पहिलाच हिंदी चित्रपट इतक्या चांगल्या कथेवरचा मिळत असेल तर नाही म्हणण्याची शक्यताच उरत नाही. तेच मी केलं’, अशी कबूली रामचरण देतो. तरीही या सशक्त पटकथेला होकार देण्यासाठी निदान वर्षभर तरी दिग्दर्शक अपूर्व लाखिया रामचरणची समजूत काढत होता. अमिताभ बच्चन यांनी गाजवलेली इन्स्पेक्टर विजयची भूमिका करण्याची रामचरणची तयारी नव्हती त्याचे महत्वाचे कारण म्हणजे तो दक्षिणेतला सुपरस्टार असला तरी बॉलिवूडची समीकरणे ही पूर्णत: वेगळी आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत यश मिळवण्याचे प्रयत्न रामचरणचे वडील चिरंजीवी यांच्यासह अनेक दाक्षिणात्य अभिनेत्यांनी केले आहेत पण त्यांना स्वत:चा ठसा उमटवता आला नाही, हा इतिहासही दुर्लक्ष करण्यासारखा नाही. ‘अपूर्वचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. अमिताभ यांनी जेव्हा हा चित्रपट केला होता तेव्हा त्यांचा चेहरामोहरा, व्यक्तिमत्त्व हे तत्कालीन सर्वसाधारण भारतीय नागरिकांसारखेच होते. त्याऊलट, आजच्या घडीला हिंदीतील जे प्रथितयश कलाकार आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वावर, त्यांच्या लुकवर अत्याधुनिक जीवनशैलीचा प्रभाव आहे. त्यामुळे माझा चेहरा हा अमिताभ यांनी साकारलेल्या इन्स्पेक्टर विजयच्या जवळ जाणारा असल्यामुळेच अपूर्वने मला या भूमिकेसाठी विचारणा केली होती. मला कथाही आवडली होती त्यामुळे मी हा चित्रपट स्वीकारला, असे रामचरणने सांगितले.
‘मी याआधी दोनदा ‘जंजीर’ चित्रपट पाहिला. आठ-दहा वर्षांपूर्वी मी हा चित्रपट पाहिला होता. तेव्हा त्यातली अ‍ॅक्शनदृश्ये पाहून भारावून गेलो होतो. त्यानंतर जेवढे म्हणून अ‍ॅक्शनपट आले असतील त्यांच्यावर याच अ‍ॅंग्री यंग मॅनचा प्रभाव होता. त्यानंतर ‘जंजीर’चा रिमेक स्वीकारल्यानंतर अपूर्वने मला पुन्हा एकदा चित्रपट दाखवला तेव्हाही मला तो प्रभाव जाणवल्याशिवाय राहिला नाही’, असे सांगणाऱ्या रामचरणने आपल्याला वडिलांमुळे दोनदा अमिताभ यांची भेट घेता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पण, सर्वात जास्त आनंद तेव्हा झाला जेव्हा अमिताभ यांनी ‘जंजीर’च्या रिमेकसाठी मला आशिर्वाद दिला, असेही तो पुढे म्हणाला. अपूर्वने मूळ ‘जंजीर’च्या व्यक्तिरेखा कायम ठेवल्या असल्या तरी पटकथा मात्र आत्ताच्या तेल माफियांचे राज, जे. डे सारख्या पत्रकाराची हत्या अशा वास्तव घटनांवर लिहिली आहे. त्यामुळे हा चित्रपट करताना फार वेगळा अनुभव घेतल्याचेही तो सांगतो.
‘जंजीर’ एकाचवेळी हिंदी आणि तेलगू भाषेत चित्रित करण्यात आला. या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान सगळ्यात मोठे आव्हान कोणते असेल तर ते मला हिंदीत संवाद बोलण्याचे आणि प्रियांका चोप्राला तेलगूत संवाद बोलण्याचे.. आम्हा दोघांनाही संवादासाठी फार वेळ लागत होता. पण, एकाचवेळी दोन्ही चित्रिकरण करत असताना अपूर्व मात्र कमालीचा शांत असायचा. ‘जंजीर’ आणि ‘तुफान’ दोघांचे यश कोणाचे असेल तर ते फक्त आणि फक्त अपूर्वचे असल्याचे रामचरणने सांगितले. बॉलिवूडमध्ये कितीही यश मिळाले तरी गडया आपुला गाव बरा.. असेच रामचरणचे म्हणणे आहे. ‘जंजीर’ हिट झाला तरी हिंदीत निवडक चित्रपटच करणार असे तो आग्रहाने सांगतो.