भौतिकशास्त्रातील पीएच डी पूर्ण करून गुरुत्वाचे संशोधन करण्याचे ठरवल्यानंतर १९७० च्या दशकात मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत असताना नोबेल विजेते अमेरिकी वैज्ञानिक रिचर्ड फेनमन यांची व्याख्याने एका तरुणाने ऐकली. त्यातील व्याख्यानांच्या निमित्ताने विचारलेल्या प्रश्नांवर फेनमन यांनी दिलेल्या उत्तरात चूक होती. ती त्याने दाखवून दिली. फेनमन यांनीही ती मान्य केली, तसे पत्रही पाठवले. नंतर या तरुणाची ही हुशारी पाहून त्याला टेक्सास विद्यापीठात प्रवेश मिळाला. त्यांचे नाव डॉ. अभय अष्टेकर. त्यांना नुकताच अमेरिकन फिजिकल सोसायटीचा आइनस्टाइन पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. अष्टेकर यांचा जन्म धुळे जिल्ह्यतील शिरपूरचा. पुण्यातील बाल शिक्षण मंदिर, कोल्हापुरातील सेंट झेवियर्स हायस्कूल आणि राजाराम कॉलेज येथून शिक्षण झाल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातील इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधून बीएस्सी पदवी घेतली. गणित व विज्ञान हे त्यांच्या आवडीचे विषय. मूलभूत विज्ञान व अभियांत्रिकी यातून पर्याय निवडताना त्यांनी मूलभूत विज्ञानाची निवड केली. लहान असतानाच अष्टेकर यांना जॉर्ज गॅमॉ यांच्या वन टू थ्री.. इनफिनिटी या पुस्तकामुळे विश्वरचनाशास्त्रात रुची निर्माण झाली. अष्टेकर यांना अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात पहिल्यांदा प्रवेश मिळाला. तेथून पीएच डी केल्यानंतर भारतीय वंशाचे नोबेल विजेते वैज्ञानिक सुब्रह्मण्यम चंद्रशेखर व रॉबर्ट गेरोश यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. चंद्रशेखर यांच्या सांगण्यावरून नंतर ते ऑक्स्फर्डला गेले. तेथे त्यांनी ब्रिटिश गणिती व भौतिकशास्त्रज्ञ रॉजर पेनरोज यांच्यासमवेत काम केले. आइनस्टाइनने भाकीत केलेल्या गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व शोधण्यात अलीकडेच यश आले. त्यामुळे हे शतक गुरुत्वीय लहरींचे राहील असे ते सांगतात. परदेशात संशोधन करतानाही पुण्यातील आयुकाशी त्यांचे संशोधनात्मक संबंध आहेत. इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सचे ते फेलो असून सध्या एबरली अध्यासनाचे प्रमुख व पेनसिल्वानिया विद्यापीठाच्या दी इन्स्टिटय़ूट फॉर ग्रॅव्हिटेशनल फिजिक्स अॅण्ड जॉमेट्री या संस्थेचे संचालक आहेत. आइनस्टाइनचा सिद्धांत अधिक सोपा करण्यासाठी त्यांनी लूप क्वांटम ग्रॅव्हिटीची संकल्पना रूढ केली. त्यात काही नवीन चलराशी मांडल्या. त्या अष्टेकर चलराशी म्हणून प्रसिद्ध आहेत. लायगो प्रकल्पात काम करणाऱ्या भारतीय वैज्ञानिकांचे त्यांनी कौतुकच केले आहे. एरवी परदेशात गेलेल्या काही वैज्ञानिकांकडे भारताच्या कामगिरीबाबत असलेला तुच्छतेचा भाव त्यांच्यात नाही.