गोष्ट १९७०च्या दशकाच्या पूर्वार्धातली. त्या वेळी भारताला उपग्रह म्हणजे काय हे माहिती नव्हते. परदेशात अनेक संशोधक पाठवणाऱ्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या संस्थेच्या अतिथिगृहात ‘तुम्ही मला उपग्रहाची बांधणी करू शकतील अशी दोन तरी माणसे द्या,’ असा हट्ट धरून एक व्यक्ती बसली होती. त्यांचे नाव डॉ. यू. आर. राव. अलीकडेच त्यांचा इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉटिकल फेडरेशनच्या ‘हॉल ऑफ फेम पुरस्कृतां’त समावेश जाहीर झाला आहे. मेक्सिकोत गुडाल्राजा येथे ६७व्या आंतरराष्ट्रीय अॅस्ट्रॉनॉटिकल काँग्रेसमध्ये त्यांना ३० सप्टेंबरला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यांचे पूर्ण नाव उडुपी रामचंद्र राव. जन्म कर्नाटकातील दक्षिण कॅनरा जिल्हय़ातील अदमारू या खेडय़ातला. म्हैसूरमध्ये शिक्षणानंतर मद्रासला विज्ञानात पदवी, बनारस िहदू विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी व गुजरात विद्यापीठातून पीएच.डी. असा त्यांचा शिक्षणप्रवास. नंतर ते अवकाशयानांच्या अभ्यासासाठी अमेरिकेला गेले. अमेरिकेतील एमआयटी संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर डलास येथील टेक्सास विद्यापीठात अध्यापन केले. १९६६ मध्ये भारतात परत येऊन अहमदाबादच्या फिजिकल रीसर्च लॅबोरेटरीत ते संशोधन करू लागले. तेथे डॉ. विक्रम साराभाई यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. देशाने पहिला आर्यभट्ट हा उपग्रह सोडला तेव्हापासून सुरू झालेली त्यांची अवकाश संशोधनातील कारकीर्द ठळकपणे नजरेत भरणारी आहे. डॉ. साराभाई व डॉ. होमी भाभा यांचा वारसा त्यांनी खऱ्या अर्थाने पुढे नेला. पहिला उपग्रह सोडण्याचा प्रस्ताव त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींपुढे मांडला गेला, तेव्हा त्यांनी डॉ. राव यांना विचारले, उपग्रहाला पसे किती लागतील, त्यावर राव यांनी तीन कोटी सांगितले. इंदिराजींनी लगेच होकारही दिला. त्या वेळी मनमोहन सिंग नुकतेच अर्थसचिव झाले होते. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत जो पहिला प्रकल्प मंजूर केला तो आर्यभट्ट उपग्रहाचा. परवडणारी घरे अजून दृष्टिपथात नसली तरी अलीकडे भारताने ४५० कोटी रुपयांतील परवडणारी मंगळ मोहीम राबवली व फत्तेही केली. त्याच्या पडद्यामागचे सूत्रधार डॉ. रावच होते. या मंगळ मोहिमेची घोषणा मनमोहन सिंग यांनी केली तेव्हा ते पंतप्रधान होते. २०१३ मध्ये वॉिशग्टन येथे ‘सॅटेलाइट हॉल ऑफ फेम ऑफ द सोसायटी ऑफ सॅटेलाइट प्रोफेशनल्स इंटरनॅशनल’ या संस्थेत समावेश झालेले ते पहिले भारतीय आहेत. १९८४ ते १९९४ या काळात त्यांनी देशाच्या अवकाश कार्यक्रमाचे नेतृत्व केले. दहा वष्रे ते अवकाश खात्याचे सचिव व इस्रोचे अध्यक्ष होते. ‘आर्यभट्ट’नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भास्कर, अॅपल, रोहिणी, इन्सॅट आदी श्रेणींचे किमान वीस उपग्रह तयार झाले. पद्मविभूषण, इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅस्ट्रॉनॉटिक्सचा थिओडोर व्हान करमान पुरस्कार, युरी गागारिन पुरस्कार असे असंख्य पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.