‘कुटुंबातूनच एखाद्याला जी गोष्ट आयती मिळते, ती टिकवण्यात कौतुक ते काय?’ - हा युक्तिवाद अगदी तार्किकच! पण व्यवहारात तो किती तोकडा ठरतो, हे कळण्यासाठी आपापल्या आसपासच्या मुलांच्या तोंडची मराठी जरूर ऐकावी. ही आयतीच मिळालेली भाषा टिकवली जाते आहे का? वडिलांनी सुरू केलेल्या वृत्तपत्राचे संपादकपद के. व्ही. संपतकुमार यांना वयाच्या ३३व्या वर्षी मिळाले आणि ३० जून रोजी अखेरचा श्वास घेईपर्यंत, ३१ वर्षे ते त्यांनी सांभाळले. हे वृत्तपत्र संस्कृत भाषेत होते. ‘सुधर्मा’ त्याचे नाव. ‘सुधर्मा’चा पहिला अंक १५ जुलै १९७० रोजी संपत यांचे वडील के. एन. वरदराज अय्यंगार यांच्या संपादनाखाली निघाला. संपत यांच्या नावाआधीच्या इंग्रजी आद्याक्षरांपैकी ‘के.’ हे कधीकाळी सुटलेल्या कलाले या गावाचे, तर ‘व्ही.’ अर्थातच वडिलांच्या वरदराज या नावाचे. गाव सोडून हे कुटुंब म्हैसूरमध्ये आले, त्यामुळे संपत यांचा जन्म म्हैसूरचाच. शालेय शिक्षण, कला शाखेतील पदवी पूर्ण करून कायद्याची (एलएलबी) पदवीही त्यांनी घेतली आणि वकिलीत जम बसवतानाच, ऑपरेशन ब्लू स्टार, इंदिरा गांधी यांची हत्या, राजीव गांधी यांचे संगणकयुग, बोफोर्स, अशा बातम्यांची संस्कृत भाषांतरे ते वडिलांना करून देऊ लागले. मंडल आयोग लागू होण्याच्या दोन दिवस आधी (५ ऑगस्ट १९९०) वडील निवर्तले. पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या, समाजकारण पालटून टाकणाऱ्या त्या निर्णयाची संस्कृत बातमी देणाऱ्या ‘सुधर्मा’चे संपादक संपतकुमार होते. ताज्या, राजकीय व सामाजिक विषयांप्रमाणेच विज्ञान, गुन्हेगारी आदी क्षेत्रांतील संस्कृत बातम्या हे ‘सुधर्मा’चे वैशिष्ट्य ठरले. स्वत: विचक्षण वाचक आणि स्वभावाने जगन्मित्र असलेले संपत आता संपादन, भाषांतर, मुद्रितशोधन ही सारीच कामे करू लागले. यात त्यांना साथ मिळाली ती संस्कृतविदूषी आणि संगणकसाक्षर पत्नी के. एस. जयलक्ष्मी यांची. जयलक्ष्मींच्या साथीने संपत यांनी ‘सुधर्मा’चा ऑनलाइन अंकदेखील काढला! ई-वृत्तपत्र स्वरूपात हे अंक विकले जाऊ लागले. अर्थात, त्याने खपात पाचशेचीच वाढ झाली आणि एकंदर खप झाला चार हजार. एवढा कमी, म्हणजे केंद्र सरकारच्या जाहिराती नाहीत आणि या एकंदर उस्तवारीचा खर्च महिना १५ लाख रुपये. अशातही ‘सुधर्मा’ टिकवणाऱ्या या दाम्पत्याला २०२० मध्ये ‘पद्माश्री’ (जोडीने) मिळाली होती. या दोन खांबांतील एक आता निखळला आहे.