कुठल्याही कुटुंबातले सगळेच सदस्य अगदी एकसारखे कधीच नसतात. प्रत्येक व्यक्ती आपलं वैशिष्ट्य, स्वभावविशेष, गुणावगुण आणि काही विशेष क्षमता घेऊन आलेली असते. घराला एकसंध ठेवताना सगळ्यांना त्यांच्या गुणावगुणांसहित स्वीकारलं जातं. कुटुंबातले सगळे जण ताणतणावरहित आणि आनंदी तेव्हाच राहू शकतात, जेव्हा तिथे प्रत्येकाच्या मताचा आदर आणि प्रत्येकाचा आत्मसन्मान राखला जातो. घरात कुणी एखादी व्यक्ती अपमानित तर होत नाहीये ना किंवा तिला डावललं जात नाहीये ना, हे बघण्याची जबाबदारी कुटुंबप्रमुखाची!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बहुतांश घरात कमावती व्यक्ती – म्हणजे वडील किंवा आई-वडील असे दोघंही कुटुंबप्रमुख असतात. आजी-आजोबा जरी असतील, तरी वयपरत्वे जबाबदारीचं हस्तांतरण झालेलं असतं. किंवा तसं होणं अपेक्षित आहे. ते जर योग्य वेळी झालं नाही, तर घरातला कर्ता पुरुष किंवा कर्ती स्त्रीच वेळोवेळी डावलली जाते. घरात तरुण मुलगा, मुलगी असतील आणि ते त्यांची मतं मांडत असतील, तर सरळ सरळ दुर्लक्ष न करता नीट ऐकून त्यावर विचार होणं अपेक्षित आहे. इतकंच नाही, तर वृद्ध किंवा आजी-आजोबांच्या विचारांचाही सन्मान व्हायला हवा. थोडक्यात काय, तर हुकूमशाही सत्तापद्धती घरात नसावी.

हेही वाचा – आहारवेद: शीतपेये गरजेपुरतीच

रश्मी आणि रोहित यांची राहती सदनिका बरीच जुनी असल्यामुळे त्याला डागडुजी आणि काही फर्निचर करण्याची गरज होती. रश्मीला तिच्या सोयीप्रमाणे कपाटं, खण आणि कप्पे करून हवे होते. रोहितनं सुरुवातीला त्यास संमती दिली होती. ऑफिसच्या कामासाठी तिला एक आठवडा चेन्नईला जावं लागलं आणि त्याच काळात रोहितनं तिचं डिझाईन डावलून त्याच्या मतानं काम सुरू केलं. सात दिवसांनी परत आल्यावर सगळं बघून रश्मी अत्यंत निराश झाली. आपण चर्चा करताना नवरा ‘हो ला हो’ करत होता आणि आपल्या माघारी त्यानं सगळं बदलवून टाकलंय, हे तिच्या पचनी पडेना. घर मनासारखं व्हावं म्हणून तीदेखील कष्ट करून पैसे जमा करत होती. नवऱ्याच्या अशा वागण्याचं तिला खूप वाईट वाटलं होतं, पण आता सुतारकाम बरंच पुढे गेल्यानं जे चालू होतं तेच स्वीकारण्यात शहाणपणा होता. रोहितच्या या वागण्यानं ती फार दुखावली गेली.

संदेशचं वय होतं पंचेचाळीस. तो आणि पत्नी कावेरी या दोघांनी अत्यंत मेहनतीनं शहरात त्यांचं घर उभं केलं होतं. त्याचे वयस्क आईवडील गाव सोडून गेली अठरा वर्षं त्यांच्याकडे रहातात. पण आजही संदेशनं घेतलेल्या अनेक निर्णयांनंतर घरात प्रदीर्घ चर्चा होते आणि त्याचं म्हणणं खोडून काढून घरातील ज्येष्ठ मंडळी आपल्याच मताप्रमाणे करतात. कावेरीदेखील सासू-सासऱ्यांचीच बाजू घेते. मग ती घराची दुरुस्ती असो किंवा कुठली मोठी खरेदी असो, नात्यात कार्यप्रसंगी आहेर देणं असो, पाहुण्यांना बोलावण्याचा निर्णय असो किंवा अगदी संदेश-कावेरीच्या मुलांच्या बाबतीतले निर्णय असोत. संदेशचं मत वारंवार उडवून लावलं जात होतं. आपल्या मताला घरात काहीच किंमत नाही, या विचारानं तो एकटा पडला, अंतर्मुख झाला. त्याला नैराश्यानं घेरलं. या नैराश्याचं नेमकं कारण कावेरीच्या लक्षात येईपर्यंत बराच उशीर झाला होता. संदेशला त्यातून बाहेर येण्यासाठी मानसोपाचार घ्यावे लागले. आपली स्वतःची एक जागा निर्माण करणं आणि आपली किंमत ठेवणं प्रत्येकाला जमतंच असं नाही. घरची मंडळी वर्चस्व गाजवणारी असतील, तर संदेशसारखा त्रास होतो.

हेही वाचा – झोपू आनंदे : घोरणे (भाग २)

स्त्रियांच्या बाबतीत तर ही नेहमीची समस्या आहे. स्त्रीच्या मताचा आदर होईलच याची काही शाश्वती नसते. कधी मुलं तिचं म्हणणं अव्हेरतात, कधी पती, तर कधी घरातले ज्येष्ठ. सरिताच्या बहिणीकडे लग्न असल्यामुळे तिनं एक साडी, मेहुण्यांना शर्टपीस आणि नवऱ्या मुलीसाठीही भेटवस्तू खरेदी केली. सासूबाईंनी मात्र त्यांच्याकडची एक हलकी साडी तिला काढून दिली. हीच आहेरात द्यायची असं सांगितलं. भेटवस्तूदेखील बदलली. सरिताला हे अजिबात आवडलं नाही. घरात कायमच आपलं मत डावलून इतर लोक निर्णय घेतात, याचं तिला नेहमी वाईट वाटे. मग तिनंही गुपचुप शक्कल लढवली. सासूबाईंनी दिलेल्या हलक्या दर्जाच्या वस्तू तिनं कपाटात लपवून ठेवल्या आणि तिच्या मनाप्रमाणे घेतलेला आहेर उत्तम वेष्टनात पॅक करून दिला. माहेरचं नातं जपण्यासाठी असं करणंच तिला योग्य वाटलं.

असे छोटेमोठे खूप प्रसंग असतात, ज्यात आपलं म्हणणं डावलून निर्णय घेतले जातात. पण हे वारंवार होऊ लागलं, तर मात्र ते माणसाचा आत्मविश्वास डळमळीत करणारं ठरू शकतं. घरातल्या प्रत्येक सदस्यानं याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. एकमेकांच्या मताचा आदर राखून आपल्याला सुवर्णमध्य साधता आला पाहिजे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are you being left out in the family ssb
First published on: 17-05-2023 at 11:04 IST