– भारती महाजन – रायबागकर

‘मला कोणाचीच गरज नाही!’ हे शब्द कसे पोकळ ठरतात, याचा अनुभव अनेकांनी करोनाकाळात घेतला. आपण कितीही स्वावलंबी, स्वतंत्र असू, पण कुटुंबातले लोक, नातेवाईक, अगदी दूरची भावंडं, मदतनीस, शेजारी, यांच्याशी विणलेल्या बंधांची आपल्याला कधी ना कधी आवश्यकता भासतेच. केवळ मदत म्हणून नव्हे, तर भावनिक पातळीवरही. कालौघात जगण्याचा आणि नात्यांचा तोल डळमळीत झालेला असताना आपल्याला आणि पुढच्या पिढीलाही नात्यांमधली लय पुन्हा जुळवावी लागेल.

chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
exam burden on children marathi news
सांदीत सापडलेले… : खरी परीक्षा!
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
a story of self confidence chaturang article
जिंकावे नि जगावेही : आपल्या माणसांचं ‘असणं’!

‘‘आम्ही गावाला चाललोय.’’ नेहमीप्रमाणे संध्याकाळी कट्ट्यावर गेल्यावर सीमानं तिच्या सख्यांना सांगितलं.

‘‘का गं? काही विशेष? की सहजच फिरायला?’’

‘‘सहजच… पण फिरायला म्हणून नाही, तर तिथे राहणाऱ्या नातेवाईकांना भेटायला. अगदी सदिच्छा भेट म्हणा ना!’’

‘‘काय म्हणालीस?’’

‘‘हो! सदिच्छा भेट. तिथे आमचे पुढच्या, मागच्या पिढीतले सख्खे, चुलत, असे अनेक नातेवाईक राहतात. माझ्याशिवाय घरातल्या बाकीच्यांना ते फक्त ऐकूनच माहिती आहेत. म्हणूनच एकमेकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन ओळख व्हावी आणि ती वाढावी… फक्त आणि फक्त हाच या चार दिवसांच्या सहलीचा हेतू! आमच्या १४ वर्षांच्या एकुलत्या एक नातवालासुद्धा अशीही काही नाती असतात हे कळेल यानिमित्तानं.’’

‘काहीतरीच बाई हिचं एकेक!’ असा भाव होता मैत्रिणींच्या चेहऱ्यावर!

त्यांचंही बरोबरच होतं म्हणा! ‘लाँग वीकेंड’ आला की कुठलं तरी पर्यटन स्थळ निवडायचं, लांबच लांब ट्रॅफिक जॅममध्ये अडकायचं आणि ‘साइट सीइंग’चे सोपस्कार आटोपून, वारेमाप खर्च करून पुन्हा तसाच परतीचा प्रवास करत दमून-भागून घरी यायचं, पुन्हा पुढच्या सुट्टीचे बेत ठरवायचे, ही आपली सध्याची सुट्टी घालवायची किंवा सण साजरा करण्याची रूढ झालेली पद्धत. त्यामुळे तिचा हा चाकोरीबाहेरचा बेत ऐकून त्यांना नवल वाटणं आलंच.

हेही वाचा – संशोधकाची नव्वदी!

फार काळ नाही लोटलेला… लग्न, मुंजी, बारशासारख्या ३-४ दिवसांच्या कार्यक्रमांच्या सहपरिवार आमंत्रणांची ‘कुंकुमशिंपित’ शुभपत्रं अगत्यानं रवाना व्हायची. त्या ‘सहपरिवारा’त आजी-आजोबांसह सख्खी, चुलत अशी सगळी मंडळी असायची. कार्याची शोभा वाढवायला ती सर्वच निवांत यावीत, अशी हृदयस्थ अपेक्षाही असायची आणि एखादा अपवाद वगळता बव्हंशी ती पूर्णही व्हायची. पण आता मात्र काळाच्या मुठीतून वेळ नावाची वाळू झरझर निसटून चालली आहे. ‘इव्हेंट’च्या आणि ‘मिनी कुटुंबा’च्या जमान्यात एखाद्या कार्याला फुरसतीनं जाण्यासाठी वेळ नसला, तरीही बैल गेल्यावर झोपा करण्यापेक्षा थोडीफार नाती-सांगाती सांभाळू या, ही जाणीव होऊ लागली आहे. कदाचित म्हणूनच चुकत चाललेल्या ताळमेळाला जागेवर आणण्यासाठी शाळा-कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींचे खास मेळावे भरवले जातात आणि त्या वेळेस शक्य तितके सर्व जण आवर्जून येतातही, हेही नसे थोडके!
घरात गृहलक्ष्मी येते, नवीन घराशी, नवीन माणसांशी ताळमेळ जमवण्याचा कधी ती प्रयत्न करते, तर कधी आपण हात पुढे करतो मायेच्या ओलाव्यानं. कधी यश मिळतं, कधी अपयश. मालकी हक्काचं पारडं झुकत राहतं, कधी इकडे, कधी तिकडे. आपुलकीचा ओलावा होतो कधी स्निग्ध, कधी रुक्ष! आयुष्य तसंच वाहत राहतं, कधी संथ गतीनं, कधी खळखळ करत. मनाच्या अथांग डोहात भल्याबुऱ्या आठवणींचा साठत राहतो गाळ. साठतच राहतो… आणि मग… बदलतात भूमिका. चांगल्या-वाईट अर्थानं कधी कधी इतिहासाची पुनरावृत्ती होत राहते.

काहीवेळा ‘आम्ही खूप केलं आतापर्यंत. आता तुमचं तुम्ही बघा!’ या गृहीतकाचा विसंवादी कणस्वर संसार-संगीताची लय बिघडवून जातो. गीताताईंच्या मुलाचं लग्न झालं. नोकरीमुळे दोघंही परगावी राहत होते. पण ‘तुमच्या नवीन संसारात लुडबुड नको’, ‘नवऱ्याची नोकरी आहे’ अशी कारणं देऊन गीताताई मुलाकडे फारशा गेल्या नाहीत. नंतर त्याला बाळ झाल्यावरही फक्त कामापुरती जाऊन त्या परत आपल्या गावी परतल्या. कर्तव्यतत्पर मुलानं, लाघवी सुनेनं खूप आर्जवं केली. मदतीला पूर्णवेळ बाई ठेवण्याची तयारी दाखवली, लोभस नातवाच्या वतीनं बोबड्या बोलीत आग्रह केला, पण व्यर्थ! ‘तिकडे करमत नाही’ हा एकच ठेका गीताताईंचा!

काही वर्षांनी गीताताईंच्या नवऱ्याला गंभीर आजार झाला. उपचारांसाठी कायमचंच मुलाकडे येऊन राहावं लागलं. त्या वेळी मुलानं कर्तव्यापोटी सगळे उपचार केले, तरी मुलासुनेच्या मनातली अढी मात्र गेली असेल का?… अनेकदा शेजारपाजारी, सहकारी यांच्याशी वर्षानुवर्षं आपले ऋणानुबंध जोडलेले असतात, पण गीताताईंसारखं ‘करमत नाही’ म्हणून आपल्या जवळच्या माणसांशी जोडून राहिलो नाही तर… वयोमानानुसार शरीरात दीर्घकाळ मुक्कामाला येणाऱ्या आजारांच्या वेळी कोण बरं धावून येईल? हाही मुद्दा कटू आणि अप्रिय वाटला तरी विचारात घ्यावा लागतो. अशा वेळी फक्त पैसाच कसा बरं कामाला येईल?

वयोवृद्धांच्या देखभालीसाठी त्यांची मुलं आणि मुलांच्या आजाराच्या वेळी त्यांची मुलं हे कौटुंबिक गृहीतक स्वीकारावं लागतंच. प्रत्येक पिढी कधी सुपात नि कधी जात्यात असणारच असते. सुपातल्यांना कधी तरी जात्यात जावंच लागतं हे लक्षात ठेवावं लागतं. ही झाली फक्त आपल्या घरातल्या सदस्यांची कहाणी. पण आत्या, काका, मामा, मावशी ही नाती कदाचित आताच्या आणि त्याच्या नंतरच्या पिढीला तर समजणारही नाहीत. ‘सख्खं’ म्हणजे काय, हे तरी कसं समजावून देणार त्यांना? शास्त्रीय परिभाषा समजली, तरीही निर्माण होणाऱ्या मानसिक पोकळीचं काय? त्यासाठी आताच जी काही जवळची, दूरची नाती शिल्लक आहेत, त्यांची त्यांना ओळख द्यायला हवी. नातेवाईकांच्या, मित्रमैत्रिणींच्या मेळाव्यांमधील २-४ तासांच्या चुटपुटत्या भेटीनंतरही शक्य झालं, तर परस्परांच्या घरी गेलो, तर भिन्न भिन्न परिस्थितीत राहणाऱ्यांची आणि घरातल्या सदस्यांचीही सगळ्यांना ओळख होईल.

परप्रांतात राहणाऱ्या सुनीलच्या वडिलांचं अल्पशा आजारपणामुळे निधन झालं. सोसायटीत त्याच्या कंपनीतले काही जण राहत होते. अंत्यसंस्कारांच्या वेळी त्यांनी बरीच मदत केली. पण आश्चर्य म्हणजे त्याच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या शेजाऱ्याला मात्र ही बातमी अजिबात समजली नव्हती. दोन दिवसांनी त्यानं सुनीललाच ‘परवा कशासाठी गर्दी जमली होती?’ असं विचारलं. अर्थात तिथे वेगळ्या भाषेचाही प्रश्न होता. तरीही समाजात राहताना शेजारीपाजारी, इतर आवश्यक गरजा पुरवणाऱ्या परंतु दुर्लक्षित असणाऱ्या व्यक्ती, मित्रमंडळी इत्यादी समाजघटकांशीही आपला व्यवस्थित ताळमेळ आहे का, हे तपासून बघायला हवं. ‘मला कोणाची गरज नाही,’ अशा मग्रूर समजुतीत राहिलं, तर काय होतं हे आपण करोनाकाळात बघितलं.

अॅम्ब्युलन्स दारात आल्याशिवाय शेजारची व्यक्ती गंभीर आजारी आहे किंवा मृत्यू पावली आहे, हेही जेव्हा कळत नाही, तेव्हा आपल्या आयुष्याची गती भोवंड येईल एवढी वाढली आहे असं समजायला हरकत नाही. हे ऐकायला जरी अतिरंजित वाटलं तरीही वास्तव परिस्थिती अशीच आहे असं म्हणावं लागतं.

हेही वाचा – ‘भय’ भूती : वारसा हक्काने मिळालेली भीती

कुटुंबीय वा स्नेहीच नाही तर समाजातल्या प्रत्येक घटकाची आपल्याला कशान् कशा प्रकारे मदत होतच असते. करोनाकाळात भल्या भल्या मोठ्या व्यापाऱ्यांनी, मॉल्सनी आपली असमर्थता प्रकट केली होती, तेव्हा छोट्या दुकानदारांनी आपल्याला यथाशक्ती मदत केली. शेतकऱ्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं होतं. पण गरज संपल्यावर आपली पावलं खरेदीसाठी पुन्हा ‘फिक्स रेट’ असलेल्या चकचकीत मॉलकडेच वळली. आजही वळतात. शेतकऱ्यांच्या अपरिमित कष्टांना योग्य न्याय मिळत नाही, त्यांचा माल आपण घासाघीस केल्याशिवाय खरेदी करत नाही. चंगळवादी जीवनशैलीत कष्टकऱ्यांच्या घामाचं मोल आपण जाणत नाही… आणि याची आपल्याला अजिबात खंतही वाटत नाही. या जगाच्या पोशिंद्याच्या उत्पादनाचा आणि खर्चाचा ताळमेळ बिघडला, तर आपल्या घरगुती अर्थसंकल्पाचा सूर बिघडायला वेळ लागणार नाही. आपली दैनंदिन आणि प्रासंगिक कामं करायला माणसं मिळताहेत तोवर आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. उद्या जास्त पैसे देऊनही त्यासाठी कोणी तयार झालं नाही, तर दात आहेत तर चणे नाहीत अशी गत होईल.

माणसांशीच काय, पण आता प्राणिमात्रांशी, पर्यावरणाशी, निसर्गाच्या तालाशीही आपला सूर जुळवून लय साधण्याची वेळ आली आहे. नव्हे निघून चालली आहे! हा प्रश्न आता एवढा ऐरणीवर आला आहे, की एखाद्या प्रलयाची वाट न पाहता त्याची आधीच जाणीव ठेवून स्वत: कृती केली पाहिजे आणि इतरांनाही भाग पाडलं पाहिजे. त्यासाठी आपल्या जीवनशैलीची घसरलेली गाडी परत रुळावर आणावीच लागेल. याची सुरुवात अगदी आजपासून… आतापासूनच करायला हवी.

bharati.raibagkar@gmail.com