मुलगी लग्न होऊन सासरी आली की, तिला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते त्यातील एक प्रश्न म्हणजे आईबाबांनी शिकवलं नाही का? असं वाग, तसं वागू नको, हे कर, ते करू नको अशा सतत सूचना देऊन झाल्यावर ‘आईबाबांनी शिकवलं नाही का कसं वागायचं’ हा प्रश्न समोर येतो. शॉर्टस किंवा स्कर्ट्स घालून मुली दिसल्या की, गल्लीतल्या काकू लगेच डोळे वटारून ‘काय आजकालच्या मुली! आईबाबांनी काही शिकवलंच नाही वाटतं’ बोलून मोकळ्या होतात. एवढंच काय, काही घरांमध्ये जेवण वाढताना पदार्थाची बाजू चुकली की, ‘आईने शिकवलं नाही का’ असं म्हणायला सगळे तयारच असतात. प्रत्येक वेळी मुलीच्या वागण्या-बोलण्यावरून आईबाबांना टोचलं जातं. पण, त्या मुलीची काही मतं असतीलच ना ? किंवा ती आईबाबांच्या मताविरुद्ध वागू शकत नाही का ?

हेही वाचा : ‘टाटा समूहा’च्या सर्वात तरुण सीईओ आहे मराठी महिला ! कोण आहेत अवनी दावडा ?

दोन दिवसांपूर्वी मैत्रिणीच्या घरी तिच्या बाळाचं बारसं होतं त्याला गेलेले. माझी मैत्रीण बाळ सांभाळत होती, सगळ्यांचं हसून स्वागत करत होती. त्यात तिच्या मावस सासूबाई आल्या. आता गडबडीत तिच्याकडून नमस्कार करायचा राहिला असेल आणि त्यात हातात बाळही होतं. पण, लगेच तिच्यावर नसलेल्या संस्कारांचा पाढा वाचण्यात आला. ‘आईबाबांनी शिकवलं नाही’ म्हणून त्याची इतिश्री झाली. तिने लगेच नमस्कार केला आणि गप्प बसली. द्विपदव्युत्तर पदवी असणारी ती या बोलण्यावर गप्प बसली. नवरा-संसार-उगीच शब्दाला शब्द नको अशी काही सारवासारव तिने आमच्याकडे केली. पण, हा पहिलाच अनुभव नव्हता. मित्रमैत्रिणींसह फिरताना गल्लीतल्या काकू ‘ही अमक्याची मुलगी ना ? काय कपडे घातलेयत ? आईबाबांनी काही संस्कार केले नाही वाटतं,’ असं म्हणून मुलींच्या वागण्याचं बिल आईबाबांवर फाडून मोकळ्या झाल्या. जेवणात तिखट जास्त झालं तर आईने जेवण करायला शिकवलं नाही का ? टिकली लावली नाही, तर संस्कारच नाही. अगदी घरी आरामात बसल्यावरही ‘बसायची काही पद्धत? आईबाबांनी शिकवलं नाही का ? असं तोंडसुख घेतलं जातं.

हेही वाचा : सीमा, अंजू… अशी कोणती परिस्थिती परदेशातील प्रियकराकडे नेते ? काय असू शकतात कारणे…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलगी ही लहानपणापासून शिकत असते. आईबाबा तिला घडवत असतात. कोणतेही आईवडील आपली मुलं वाईट व्हावी, वाईट वागवीत या हेतूने शिकवत नाही. परवा अंजू पाकिस्तानमध्ये निघून गेली, तर तिच्या वडिलांना कारण विचारण्यात आले. आता त्यांनी तिला ‘तू पाकिस्तानात जा’ असं शिकवलं असेल का? आईवडील त्यांच्यापरीने सर्व संस्कार, विचार मुलांना देत असतात. परंतु, मुलगी हीसुद्धा स्वतंत्र व्यक्ती आहे, तिला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे, स्वतःचे विचार करण्याची क्षमता आहे, हा विचार कोणीच करत नाही. काय कपडे घालावेत हा तिचा प्रश्न आहे, केस कसे रंगवावेत का तिचा प्रश्न आहे किंवा तिच्या काही वागण्यांना घरच्यांची संमतीही असू शकते. दिल्लीमध्ये एका मुलीला भर रस्त्यात ठेचून मारलं, तेव्हाही ‘रात्री कशाला जायचं बाहेर? आईबाबांनी का पाठवलं?’ अशा कमेंट्स करण्यात आल्या. निर्भया बलात्कारप्रकरणी ‘रात्री मित्रासोबत का फिरायचं? आईबाबा शिकवत कसं नाहीत?’ असा म्हणणारा एक वर्ग होता. परंतु, प्रत्येक वेळी मुलीच्या आईबाबांना का मध्ये आणायचे? त्यांनी कदाचित तिला जाऊ नको असेही म्हटले असेल. तरीही तिने बाहेर जाणे, हा तिचा विचार झाला. यात आईबाबांची चूक काय? आणि मुलीकडून होणारी चूक ही मुद्दाम झालेली नसते. भाजीत जास्त पडणारं तिखट, घाईगडबडीत करायचा राहिलेला नमस्कार, चुकून घरातलं राहिलेलं काम हे मुद्दाम केलेलं नसतं. त्यामुळे उगीच ‘आईबाबांचे संस्कार’ काढण्याची काहीच गरज नसते. आपण कदाचित दुसऱ्या मुलीच्या आईबाबांचे संस्कार काढत असू, उद्या ही वेळ आपल्या मुलींचेही कोणीतरी संस्कार काढतील तेव्हा येईलच.
त्यामुळे मुलींच्या चुकांसाठी ‘आईबाबांनी शिकवलं नाही का’ म्हणणे चुकीचेच ठरेल.