Mirabai Chanu’s Inspiring Journey : मीराबाई चानू ही जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय वेटलिफ्टर.  हे पदक जिंकून तिने स्वतः बरोबर भारताच्याही शिरपेचामध्ये मनाचा तुरा रोवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण मीराबाईच्या बाबतीमध्ये अगदी खरी ठरली. लहानपणापासून चपळ असणाऱ्या सैखोम मीराबाई चानूचा जन्म ८ ऑगस्ट १९९४ रोजी नॉन्गपोक काकचिंग या मणिपूरच्या इम्फाळ शहरामध्ये  मेईतेई या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मीराबाई तिच्या लहानपणी लाकडाची मोळी अगदी  सहजपणे जंगलातून उचलून घरी आणत असत, परंतु तिच मोळी तिचा भाऊ उचलू शकत नव्हता. मीराबाईमध्ये असलेल्या ताकदीचे कौशल्य तिच्या घरच्यांनी तेव्हा ओळखले आणि त्या ताकदीचा उपयोग योग्य ठिकाणी झाला पाहिजे यासाठी वयाच्या १२ व्या वर्षी मीराबाईला मणिपूर मधील स्पोर्ट्स अकादमीमध्ये वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण घेण्यास पाठवले. इथेच तिच्या आयुष्यातील खरी परीक्षा सुरु झाली.

मीराबाईचे वडील सैखोम कृती मैतेई हे पीडब्लूडी विभागामध्ये नोकरी करत तर आई सैखोम ऊंगबी तोम्बी लीमा स्वतःचे दुकान चालवत. दोन बहिणी आणि एक भाऊ असे तिचे कुटुंब आहे. लहानपणापासूनच अवजड वस्तू उचलण्याची सवय मीराबाईला होती. तिच्यातील हा गुण पारखूनच तिला तिच्या कुटुंबाने नेहमीच साथ दिली आणि शारीरिकदृष्ट्या तसेच मानसिकदृष्ट्या वेटलिफ्टिंगसाठी सक्षम होण्यास मदत केली. अर्थात तिचा संघर्ष चुकला नाही. कधीच हार न मानता ती प्रत्येक संकटाला अगदी धैर्याने सामोरी गेली. वेटलिफ्टिंगचे  प्रशिक्षण घेण्यासाठी मणिपूर स्पोर्ट्स अकादमीमध्ये जाण्यासाठी ती वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकमधून प्रवास करे. परंतु यश संपादन केल्यानंतर ती कधीच आपल्याला मदत करणाऱ्या लोकांना विसरली नाही. तिने आकाशात उंच झेप नक्कीच घेतली परंतु तिचे पाय अजून जमिनीवरच आहेत, हे तिने त्या ट्रक चालकाचा सन्मान करून सिद्ध केले.

मीराबाईने आपले ध्येय डोळ्यासमोर ठेऊन कुंजरानी देवी यांच्या मार्गदर्शनाखाली वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली त्यांच्या सहवासामध्ये तिने खेळातील उत्तम कौशल्ये आत्मसात केली. त्यासाठी तिने अथक परिश्रम घेतले.

चानूने २०१४ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, ग्लासगो येथे महिलांच्या ४८ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून आपल्या खडतर प्रयत्नांना न्याय मिळवून दिला. २०१७ मध्ये तिने सर्वात मोठी कामगिरी केली. तिने अनाहिम, कॅलिफोर्निया येथे झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवत स्वतःसोबत भारताला देखील यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवले. आणि तिच्या या यशामुळे चानू संपूर्ण जगाच्या प्रकाशझोतामध्ये आली.

२०१८ मध्ये मीराबाईला  पाठदुखीसारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागले. उपचारासाठी तिला अमेरिकेत पाठवण्यात आले. परंतु आलेल्या संकटासोबत दोन हात कसे करायचे याची सवय तिला लहानपानापासून होतीच;  न खचता आपल्या आजारावर मात करत पुन्हा एकदा तेवढ्याच जोमाने तिने खेळाला सुरुवात केली. तिने २०१९मध्ये  थायलंड वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून पुनरागमन केले आणि तेथे चौथे स्थान मिळवले. त्यावेळी मीराबाईने प्रथमच सर्वात जास्त वजन उचलले होते.

इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल २०२२ स्पर्धेत आपली  जबरदस्त कामगिरी कायम ठेवत मीराबाईने पुन्हा एकदा भारताला सुवर्णपदक मिळून दिले. मीराबाई चानू हिच्या  खेळातील योगदानाबद्दल तिला भारत सरकारने २०१८मध्ये पद्मश्री पुरस्कार तसेच  मेजर ध्यानचंद खेलरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. मीराबाईचे वेटलिफ्टिंगमधील खेळाचे उत्तम प्रदर्शन पाहून तिच्याकडून भविष्यात यापुढेही असेच चांगले कार्य करून आणखी पदके मिळवून युवा मुलींसमोर एक नवीन आदर्श निर्माण करावा अशी आशा आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From lifting firewood to carrying the weight of a nation mirabai chanu life journey kmd
First published on: 14-08-2022 at 22:00 IST