समाज कितीही प्रगत आणि शिक्षित झाला तरीही अनिष्ठ रुढींतून बाहेर पडत नाहीत. पूर्वापार चालत आलेल्या हुंडा प्रथेला आजही अनेक भागात खतपाणी घातलं जातं. हुंडाबळीच्या घटना कमी झालेल्या असल्या तरीही हुंडा घेणे थांबलेलं नाही. या हुंडा प्रथेविरोधात एका महिलेने तब्बल १४ वर्षे लढा दिला. एवढंच नव्हे तर वर पक्षाला धडा शिकवण्याकरता ती स्वतः कायद्याचा अभ्यास शिकली. प्रियदर्शनी राहुल (वय ३७) असं या महिलेचं नाव असून त्या दिल्लीत राहतात. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

प्रियदर्शनी या राज्यशास्त्राच्या पदवीधर आहेत. २०११ साली वयाच्या २४ व्या वर्षी त्यांचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर इतर मुलींप्रमाणे त्याही आपल्या भावी आयुष्याचं स्वप्न रंगवू लागल्या. पण ज्याच्याबरोबर त्यांनी स्वप्न रंगवलं तो अत्यंत रुढीवादी निघाला. मुलाच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी हुंडा मागितला. मुलगा सरकारी अधिकारी असल्याने अर्थातच हुंड्याची रक्कम अधिक होती. त्यांना हुंड्यात चारचाकी गाडी हवी होती. प्रियदर्शनी यांचे वडील नुकतेच सरकारी कामातून निवृत्त झाले होते. तर, आई गृहिणी होती. त्यामुळे त्यांच्यासाठी चारचाकी घेणं जरा खर्चिक होतं. प्रियदर्शनीच्या कुटुंबियांना चारचाकी देणं कठीण गेल्याने मुलाकडच्यांनी हे लग्न मोडलं.

ठरलेलं लग्न मोडल्याने प्रियदर्शनी आणि तिच्या कुटुंबाची समाजात अवहेलना सुरू झाली. त्यांची समाजात नाचक्की झाल्याने प्रियदर्शनी यांना राग अनावर झाला. आपल्या कुटुंबाची चुकी नसतानाही त्यांना या गोष्टीची लाज का वाटली पाहिजे? याविरोधात त्यांनी कायदेशीर लढाई लढवण्याचं ठरवलं. पण तिच्या या लढ्यालाही समाजातून विरोध झाला. तिने कायदेशीर लढाई लढू नये याकरता तिच्यावर दबाव टाकण्यात आला. पण, इरेला पेटलेल्या प्रियदर्शनी यांना मुलाच्या कुटुंबियांना धडा शिकवायचाच होता.

हेही वाचा >> वकिली सोडली अन् धरली अनोखी वाट; वाइल्डलाइफ फोटोग्राफीत रमलेल्या आरजू खुरानाची गोष्ट

असा होता लढा

रागाने पेटून उठलेल्या प्रियदर्शनी यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात प्रियदर्शनी यांनी स्वतःच कायद्याचा अभ्यास सुरू केला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायलयापर्यंत पोहोचलं. “मी कधीही वुमेन कार्ड खेळले नाही. पण तुमचा स्वाभिमान कसा आहे, तुम्ही ठरवायचं असतं, समाजाने नाही”, असं प्रियदर्शनी म्हणाल्या. प्रियदर्शनी यांनी तब्बल १४ वर्षे याविरोधात लढा दिला. गेल्यावर्षी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात निकाल लागला. अर्थात हा निकाल प्रियदर्शनी यांच्या बाजूने लागला. न्यायालयाच्या आदेशानुसार, प्रियदर्शिनी यांना ११ लाखांची नुकसानभरपाईही मिळाली. पण त्यांनी ती नुकसानभरपाई दान केली. सर्वोच्च न्यायालय ॲडव्होकेट्स वेलफेअर फंडात त्यांनी ही रक्कम जमा केली. यातील निधी गरजू याचिककार्त्यांना वापरला जातो. त्या म्हणाल्या, “मी नुकसानभरपाईच्या रकमेचा एक पैसाही घेतला नाही, पण तो सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनला गरजू याचिकाकर्त्यांसाठी दान केला. जसे मी एकेकाळी होते.”

वकिलाशीच केलं लग्न

प्रियदर्शनी आता दिल्लीत राहतात. विविध संस्था, कॉर्पोरेशन, राजकारण्यांना कायदेशीर सहाय्य करण्यासाठी त्या नियमित पुण्यातही येत असतात. २०१५ मध्ये त्यांनी पुण्यातील प्रतिष्ठित सिम्बायोसिस लॉ स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या वकिलाशी लग्न केले. त्यांच्या पतीने त्यांना मोलाचं सहकार्य करून संघर्षाच्या काळात त्यांना खूप प्रोत्साहन दिलं.

आता हुंडा पीडितांना करतात मदत

२००९ साली अब्दुल कलाम यांनी सुरू केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संसद सदस्यांना दिला जाणारा संसदर रत्न अराजकीय पुरस्कार समितीच्या २०२३ साली अध्यक्षाही प्रियदर्शनी होत्या. प्रियदर्शनी यांनी नेक्स्ट जेन पोलिटिकल लीडर्स या एनजीओची स्थापनाही केली आहे. या संस्थेतून त्या सर्व पक्षांमधील राजकीय इच्छुकांना प्रशिक्षण देतात. प्रियदर्शिनी हुंडा पीडितांना आजही सहकार्य करतात. प्रत्येक हुंडा पीडिताला तिचा सन्मान आणि आत्मविश्वास परत मिळवण्यास त्या मदतही करतात.