वैवाहिक नाते आणि संसार टिकण्याकरता उभयतांनी समजुतीने आणि सबुरीने घेणे आवश्यक आहे यात काही वादच नाही. मात्र काहीवेळेस परीस्थिती हाताबाहेर जाते आणि वैवाहिक वाद विविध याचिकांच्या रूपात न्यायालयात पोचतात. ‘क्रुरता’ हे घटस्फोटाची मागणी करणार्‍या याचिकांमधले सर्वात मोठे कारण आहे. ‘क्रुरता’ या संज्ञेची कायद्यात व्याख्या असली तरी ती सर्वसामावेशक नाही आणि असूही शकत नाही. म्हणूनच बदलत्या परीस्थितीत एखादे कृत्य करणे किंवा न करणे ही क्रुरता आहे किंवा नाही, याचा निर्णय न्यायालयांना करावा लागतो.

अशाच एका प्रकरणात, पत्नीने पतीसोबत त्याची नोकरी असलेल्या शहरात वास्तव्याचा आग्रह धरणे क्रुरता आहे का? असा प्रश्न छत्तीसगढ उच्च न्यायालयासमोर उपस्थित झाला होता. या प्रकरणात विवाहानंतर कालांतराने कुरबुरी आणि वादावादी सुरू झाल्या. पत्नीला पतीसोबत तो जिथे नोकरी करतो त्या शहरात राहायचे होते आणि पतीची त्याला तयारी नव्हती. या सगळ्याचे पर्यवसान दोघे स्वतंत्र राहण्यात आणि नंतर पतीने पत्नी कारणाशिवाय विभक्त राहत असल्याच्या आणि क्रुरतेच्या कारणास्तव घटस्फोट मागण्यात झाले.

हेही वाचा… पालकत्वः तुमची मुलं आहेत समाधानी?

या प्रकरणात पतीने पत्नीवर क्रुरतेचे आरोप केले, तर पती त्याच्या कामाच्या ठिकाणी येऊन राहण्यास मनाई करतो असे पत्नीचे म्हणणे होते. कौटुंबिक न्यायालयाने विभक्त राहणे आणि क्रुरता यापैकी काहीही सिद्ध न झाल्याने पतीची याचिका फेटाळळी. त्याविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यात आले.

उच्च न्यायालयाने-

१. पत्नी पतीसोबत त्याच्या कामाच्या ठिकाणी एकत्र राहण्यास तयार आहे.

२. पती तिला सोबत राहू देण्यास मनाई करतोय आणि अशा परिस्थितीत ती स्वतंत्र राहत असेल तर यात पतीचाच दोष आहे.

३. कोणत्याही सबळ किंवा अधिकृत कारणाशिवाय पती-पत्नीला त्याच्यासोबत राहण्यास मनाई करत असेल आणि पत्नी पतीसोबत राहण्याचा आग्रह करत असेल, तर अशा आग्रहास क्रुरता म्हणता येणार नाही अशी निरीक्षणे नोंदविली आणि अपील फेटाळले.

या निकालाच्या अनुषंगाने विभक्त राहणे याची सुद्धा चर्चा होणे आणि ते समजून घेणे गरजेचे आहे. कोणताही जोडीदार कोणत्याही सबळ कारणाशिवाय विभक्त राहत असेल तर त्या कारणास्तव घटस्फोट मागितला आणि मंजूर केला जाऊ शकतो. मात्र एखाद्या जोडिदाराने हिंसा, छळ, क्रुरता किंवा इतर मार्गाने दुसर्‍या जोडीदाराला त्याच्यासोबत राहणे अशक्य केल्यास, दुसरा जोडीदार स्वतंत्र आणि विभक्त राहत असेल, तर पहिल्या जोडीदाराला दुसरा जोडीदार असा विभक्तपणे राहत असल्याचा घटस्फोटाकरता कारण म्हणून वापर करता येत नाही. अशा कारणांमुळे आणि अशा परीस्थितीत विभक्त राहण्याच्या कारणास्तव घटस्फोट मंजूर केल्यास, नकोशा जोडीदाराला विभक्त राहण्यास भाग पाडून परत त्याच आधारावर घटस्फोट मागण्याकरता रान मोकळे होईल, म्हणून कायद्याने तशी परवानगी दिली जात नाही.

हेही वाचा… गच्चीवरची बाग: सुगंधाचे गंधकोष मरवा, दवणा…

आपल्याकडे सर्वसाधारणत: वैवाहिक वाद, समस्या त्याबाबतच्या कायदेशीर तरतुदी याबाबतची माहिती विवाहेच्छुक लोकांना नसतेच आणि त्यांना ती फारशी देण्यातही येत नाही. परिणामी दुर्दैवाने अशी परिस्थिती आल्यास याबद्दल काहीच माहिती नसल्याने, ती परीस्थिती त्यांना हाताळता येतेच असे नाही. म्हणूनच या आणि अशा गोष्टींची तोंडओळख आणि जुजबी का होईना माहिती विवाहा अगोदरच विवाहेच्छुक व्यक्तींना असायला हवी, जेणेकरून दुर्दैवाने वैवाहिक वाद न्यायालयात पोहोचल्यास त्यांना आपल्या कायदेशीर परिस्थितीची पुरेशी कल्पना अगोदरच येऊ शकेल आणि ती परीस्थिती हाताळण्यास ते सक्षम असतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

tanmayketkar@gmail.com