-डॉ. किशोर अतनूरकर
कुटुंब मर्यादित ठेवणं ही काळाची गरज आहे, हा आजकाल फारसा चर्चेचा विषय राहिलेला नाही. असं असलं तरी, या निर्णय प्रक्रियेच्या अनेक बाजू असतात. एखाद्या स्त्रीचं पाहिलं सिझेरियन झालं आहे, तिला एक पाच वर्षाचा मुलगा किंवा मुलगी आहे. असं असताना – गर्भारपणाची नैसर्गिक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अथवा गर्भारपण सुरु होण्याच्या अगोदर काही कारणांमुळे सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला आणि त्या स्त्रीला जर विचारलं, की या शस्त्रक्रियेबरोबरच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करायची का ? तर या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर हो किंवा नाही असं अपेक्षित आहे. मात्र अगदी सुशिक्षित, सधन स्त्रियांकडून देखील या प्रश्नाचं लगेच हो किंवा नाही असं दिलं जात नाही.
‘माझ्या मनात तर तसंच आहे, पण ‘हे’ काय म्हणतात विचारा ना.’ किंवा ‘आमची तयारी आहे, परंतु सासूबाईंना वाटतंय दुसऱ्या वेळेस मुलगा किंवा मुलगी झाला तर करू नाही तर मुलासाठी किंवा मुलीसाठी तिसरा चान्स घ्यावा.’ अशी उत्तरं दिली जातात. वास्तविक पाहाता निदान सुशिक्षित जोडप्यांमध्ये दुसऱ्या गर्भधारणेच्या शेवटच्या तीन महिन्यात या विषयावर संवाद होऊन, आई-वडील, सासू-सासरे आणि डॉक्टर यांच्याशी चर्चा होऊन, दुसऱ्या वेळेस सिझेरियन झाल्यास त्याच्याचबरोबरीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करायची की नाही हा निर्णय व्हायला हरकत नाही, पण तसं प्रत्येक वेळेस होत नाही.
आणखी वाचा- महिला सजग! आरोग्य विमा काढणाऱ्या महिलांचे वाढले प्रमाण, गतवर्षीच्या तुलनेत ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ
याचं मुख्य कारण म्हणजे दुसऱ्या वेळेस आपल्या मनात आहे त्या लिंगाचं बाळ जन्माला येईल की नाही हे माहिती नसल्यामुळे हा निर्णय काही लोकांना घेऊन ठेवता येत नाही. दुसरं म्हणजे, बाळाच्या जन्माच्या काही मिनिटांतच हा निर्णय घ्यावा लागतो. समजा आपल्याला हवं आहे त्या लिंगाचं बाळ (मुलगा किंवा मुलगी ) जन्माला आलं, बाळाच्या डॉक्टरांनी तपासून बाळाची तब्येत चांगली असं सांगितलं तरी, नुकत्याच जन्मलेल्या बाळाचं काय सांगावं? हा प्रश्न त्यांच्या मनात अनुत्तरित रहातो. खरं पाहिलं तर या बाळाला जरा मोठं होऊ द्यावं, त्याला चालता-बोलता-ऐकता येतं का नाही हे बघावं, बाळ पुरेसं मोठं ( निदान ३ वर्षाचं ) झाल्यानंतर मग कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यावा आणि तो पर्यंत काही तरी ‘साधन’ वापरण्याची समज ठेवावी, असंही अनेकांना वाटतं.
अशावेळी खरं तर ज्या पुरुषाच्या पत्नीचे यापूर्वी दोनदा सिझेरियन झाले असेल तर कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी तिसऱ्यांदा तिच्याच शरीरावर कातर चालवण्यापेक्षा त्याने स्वत:च पुरुष नसबंदी करून घ्यावी, हे जास्त योग्य ठरू शकतं.
कारण काही वेळा परिस्थिती बदलू शकते. दुसऱ्या सिझेरियननंतर ‘साधन’ ( समजा कंडोम ) वापरत असताना ते ‘फेल’ गेल्यास नको असलेली गर्भधारणा राहाण्याची शक्यता असते. तशी ती राहिल्यास दोन सिझेरियन झाल्यानंतर गर्भपात करणं त्या स्त्रीसाठी जोखमीचं असतं आणि डॉक्टरलादेखील असा गर्भपात करणं अवघड जातं. असं काही झालं तर सिझेरियन शस्त्रक्रिये सोबतच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून टाकली असती तर बरं झालं असतं असं वाटून जातं.
आणखी वाचा- समुपदेशन : आईपणाचा परिघ
ग्रामीण भागातील अशिक्षित जोडप्यांकडून दोन सिझेरियन झाल्यानंतर कितीही कानी-कपाळी ओरडून सांगून ‘साधन’ वापरतीलच अशी खात्री देता येत नाही, त्यामुळे ‘आमच्या नशिबात जे होईल ते होईल, आम्ही गरीब माणसं आहोत आम्हाला ते वापरायचं बी कळत न्हायी अन शेताकडचं कामं सोडून येणं बी होत नाही, आता या सिझरिंग संगत फॅमिली ऑपरेशन बी करून टाका. ’ अशी अडचण सांगतात. या परिस्थितीत त्यांच्याशी चर्चा करून संमतीपत्रकावर स्वाक्षरी घेऊन सिझेरियन सोबत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचा हा थोडा जोखमीचा निर्णय डॉक्टरांना घ्यावा लागतो.
सिझेरियन सोबत असो वा एरवी, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा निर्णय हा कायमचा निर्णय असतो. तो विचारपूर्वक घेतला जावा असा अलिखित नियम आहे. सिझेरियन सोबत ही शस्त्रक्रिया करणं, हा एक सोयीचा भाग असला तरी त्या वेळेस घाईत निर्णय घेतल्याने कधी कधी नंतर पश्चातापाची वेळ येऊ शकते. रिस्क घ्यायला नको म्हणून सिझेरियनच्यावेळेस कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करण्यासाठी आजकाल डॉक्टर देखील चटकन तयार होत नाहीत. ते एका दृष्टीने योग्यच आहे.
( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एम एस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.
atnurkarkishore@gmail.com