जॉबकार्डचे नूतनीकरण नाही; खुदावाडीची भकासवाडी झाली! दुष्काळी स्थितीत हाताला काम नसल्याने खुदावाडी गावातून जवळपास ३०० मजुरांवर स्थलांतराची वेळ आली आहे. रोजगार हमीचे काम मागणाऱ्या १९० महिलांनी अर्ज भरूनही काम मिळत नाही. येत्या गुरुवापर्यंत (दि. ५) काम न दिल्यास महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा मजूर महिलांनी दिला आहे. काम नसल्याने स्थलांतर आणि गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खुदावाडी गावात २५ टक्के लोक शेती आणि तब्बल ७५ टक्के लोक मजुरी करतात. भीषण दुष्काळामुळे या वर्षी शेतात कामच नसल्याने मनरेगांतर्गत कामावर जवळपास एक हजार मजूर होते. परंतु या कामात अनेक लोकांनी भ्रष्टचार केल्याने, तसेच काही लोकांनी तक्रारी दाखल केल्याने सरकारने या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नवीन कामे बंदच आहेत. एकीकडे सरकार दुष्काळामुळे मागेल त्याला काम देण्याची घोषणा करीत आहे, तर दुसरीकडे काम मागणाऱ्या मजुरांना कामेच दिली जात नाहीत. मागील ६ महिन्यांपासून मागणी करूनही काम मिळत नसल्याने गावात चिंतेची स्थिती आहे. गोरगरिबांचे आर्थिक शोषण वाढले, मुलांच्या शिक्षणाचे तीन-तेरा, उपासमार, स्त्रियांवर अत्याचार अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. एके काळी राज्यात नावलौकिक असणाऱ्या खुदावाडीची आज मात्र भकासवाडी झाली आहे. कामात भ्रष्टाचार झाला म्हणून काम बंद हे सरकारचे धोरण आहे. मात्र, मूठभर लोकांच्या कारनाम्यांमुळे ढीगभर लोक उपाशी अशी अवस्था या लोकांची झाली आहे. २० एप्रिलला १९० महिला-पुरुषांनी नमुना नं. ४ भरून दिले. नियमानुसार १५ दिवसांत त्यांना काम देणे बंधनकारक आहे. येत्या गुरुवारी त्यांना काम द्यावे अन्यथा काम न करता जागेवर बेरोजगार भत्ता द्यावा लागणार आहे. असे असले, तरी सरकारचा एकही माणूस अजून इकडे फिरकला नसल्याकडे इंदूमती कबाडे यांनी लक्ष वेधले. आणखी १४० मजुरांचे अर्ज भरून तयार आहेत. परंतु मागील ८ दिवसांपासून ग्रामविकास अधिकारी गावाकडे फिरकलाच नसल्याची माहितीही महिलांनी दिली. मागील कामाच्या चौकशीचे कारण खुदावाडीत या आधी मोठय़ा प्रमाणात रोजगार हमीची कामे झाली आहेत. मात्र, संबंधितांनी बनावट मजुरांची नावे लावून मोठय़ा प्रमाणात गरव्यवहार केला. मात्र, आता काम मागणाऱ्या मजुरांना याच प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबण्यास सांगितले जात आहे. गरव्यवहाराची चौकशी होईल तेव्हा होईल. आम्हाला काम द्या, आमचे जगणे मुश्कील झाले आहे. आमच्या लेकरांची उपासमार होत आहे. पाहुणे-रावळे यांच्याकडून पसे उसने घेऊन, तसेच गावातील सावकारांकडून व्याजाने पसे काढून आम्ही आमच्या चुली पेटवत आहोत, अशी हृदयद्रावक कहाणी महिला कामगार निर्मला नरवडे, शांताबाई इटलकर, बसवराज बोंगरगे, रागिणी मोरे आदींनी कथन केली. जॉबकार्डचे नूतनीकरण नाही ६५ वर्षांच्या धडधाकट मजुरांना कामावर घेतले जात नाही. रोजगार सेवक बनावट नावे यादीत घालतो. ग्रामसेवक सहकार्य करीत नाही. बेरोजगार युवकांचीही संख्या मोठी असल्याने त्यांना काम मिळणे गरजेचे आहे. कामे नसल्याने या भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मुलांच्या शैक्षणिक जीवनावर परिणाम, कौटुंबिक हिंसाचार, गोरगरीब महिला, विधवा, परितक्त्या यांचे शोषण, अशा तक्रारींचा भडिमार जमलेल्या महिलांनी केला.