मुंबई,ठाण्यात पावसाचा धमाका, रायगडलाही झोडपले अतिवृष्टीचा वेधशाळेचा इशारा खोटा ठरतोय की काय, असे वाटत असतानाच शनिवारी मराठवाडय़ात रिमझीम पाऊस पडला. विदर्भात मात्र दडी मारलेल्या पावसाने दमदार पुनरागमन केले. मुंबई-ठाणे, पुणे परिसरात शनिवारी पहाटेपासून मुसळधार पावसाचा धमाका सुरू होता. तर रायगड जिल्ह्य़ाला सरींनी झोम्डपून काढले. अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर शनिवारी मराठवाडय़ात ढगाळ वातावरण होते. पावसाची एखादी सर यायची, पण त्यात जोर नव्हता. पुन्हा एकदा रस्ते ओले होतील, एवढाच पाऊस औरंगाबादमध्ये होता. उस्मानाबाद, परभणी, लातूर जिल्हय़ातही पावसाची भुरभुर सुरू होती. मराठवाडय़ात आतापर्यंत केवळ ३५ टक्के पाऊस झाला आहे. श्रावणात दडी मारलेल्या पावसाचे विदर्भात जोरदार पुनरागमन झाले. शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस शनिवारी सकाळपर्यंत कायम होता. सकाळी ८.३० वाजेपर्यंत शहरात १४१.९ मिमि पावसाची नोंद घेण्यात आली. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्य़ात देखील मुसळधार पाऊस झाला. यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशीम आणि अमरावती शहरात पाऊस सुरू आहे. अमरावती येथे गेल्या २४ तासात ३६ मिमि पावसाची नोंद घेण्यात आली. मुंबई, ठाण्यात दमदार मुंबई, ठाण्यासह रायगड जिल्ह्य़ाला पावसाने झोडपून काढले आहे. मुंबई, ठाण्यातील पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला. पुण्यातही जोरदार पाऊस पडला. मुंबईच्या पूर्व उपनगरात सकाळपासून पावसाने जोर धरला. भांडुप व कांजूर या भागात रेल्वे रूळ पाण्याखाली गेले. त्यामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू होती. ठाणे जिल्ह्य़ासह रायगड, पालघरमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्य़ातील उरण व चिरनेर येथे मोठा पाऊस पडला.