दप्तर दिरंगाई आणि कामात दुर्लक्ष करणाऱ्या औरंगाबाद परिमंडळ कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर महावितरणकडून शिस्तभांगची कारवाई करण्यात आली. यात २० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. तर १४८ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून ३५ कर्मचाऱ्यांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. महावितरणकडून सातत्यानं त्याबाबत जागृती केली जात आहे. मात्र काही अधिकारी कामात कुचराई करत असल्यानं अखेर ही कारवाई करण्यात आली.

औरंगाबाद आणि जालना शहरात वीज गळतीचे प्रमाण ३० ते ४० टक्के आहे. आकडे टाकून विजेचा वापर करणे, मीटरमध्ये फेरफार करणे, रिमोट कंट्रोलचा वापर करणे अशा पद्धतीनं वीज चोरी केली जात असून त्याचा महावितरणला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. अधिकारी यांच्यावर कारवाई केल्यानंतर नागरिकांनी वीजचोरी करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा महावितरणकडून देण्यात आला. नियमित वीजबिल भरणा करावा, असे आव्हान देखील करण्यात आले असून वीज बिलाचा भरणा वेळेवर न करणाऱ्यांवर कारवाई करा, असा आदेश अधिकारी वर्गाला देण्यात आला.