पॅरिस येथील ऐतिहासिक हवामान करारास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. महात्मा गांधी जयंतीला म्हणजे २ ऑक्टोबर रोजी त्याची औपचारिकता पूर्ण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीतील निर्णयांवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले, की पॅरिस कराराला आज मान्यता देण्यात आली आहे. हा करार अमलात आणणाऱ्या देशात भारत हा एक महत्त्वाचा देश आहे. त्यामुळे भारताला पर्यावरण काळजी व हवामानविषयक काळजी आहे हेच या निर्णयातून सूचित केले आहे. आतापर्यंत ६१ देशांनी हा करार मान्य केला आहे. भारताने कार्बन उत्सर्जन ५१.८९ टक्के इतके खाली आणण्याचे मान्य केले आहे. तापमानवाढ २ अंश सेल्सियसच्या खाली ठेवण्याचा हेतू या करारात आहे. कोरिया-भारत करार एकमेकांच्या सागरी शिक्षण संस्थांच्या प्रमाणपत्रांना मान्यता देण्याच्या दक्षिण कोरियाबरोबरच्या कराराला मान्यता देण्यात आली. १९७८ मधील प्रमाणित सागरी प्रशिक्षण जाहीरनाम्यानुसार हा करार करण्यात आला आहे. नवप्रवर्तनास उत्तेजन भारत व सिंगापूर यांच्यात नवप्रवर्तनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या समझोता करारास मान्यता देण्यात आली आहे. औद्योगिक मालमत्ता पेटंट, व्यापारचिन्हे या मुद्दय़ांवर द्विपक्षीय सहकार्याचा यात समावेश आहे. हिंदुस्थान केबल्सला पॅकेज हिंदुस्थान केबल्स लि. या कंपनीला सरकारने कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती लाभ व सरकारी कर्जाचे समभागात रूपांतर करण्यासाठी ४७७७.०५ कोटी रुपयांचे साहाय्य मंजूर केले आहे. कोलकाता येथील ही कंपनी बंद करण्यास मान्यता देण्यात आली आहे.