साहसी खेळ म्हणून दहीहंडीवरील निर्बंध उठवायची मागणी होत असेल तर रस्त्यावर चालताना, वाहन चालवताना, रेल्वेतून प्रवास करताना तसेच रेल्वेच्या टपावर स्टंट करण्यालाही साहसी खेळाचा दर्जा द्यावा, असा खोचक टोला दहीहंडी उंचीच्या मर्यादेसाठी न्यायालयीन लढाई देणाऱ्या याचिकाकर्त्यांकडून राजकारण्यांना हाणण्यात आला आहे. दहीहंडी उत्सवात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात काल मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. यावेळी स्वाती पाटील यांनी २० फुटांपेक्षा जास्त थरांच्या दहीहंडीचे समर्थन करणाऱ्या राजकारण्यांचा समाचार घेतला. न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा आपल्याला देशद्रोही घोषित करावे आणि अटक करावी, अशी मागणी स्वाती पाटील यांनी केली.
…हंडी फोडलीच नाही, तर मनुष्यवधाचा गुन्हा कसा, राज यांचा सवाल
दहीहंडीची उंची २० फूट असावी आणि थरामध्ये १८ वर्षांखालील मुलांचा सहभाग नसावा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते. हायकोर्टाने घातलेले निर्बंध सुप्रीम कोर्टानेही कायम केले होते. मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. दहीहंडी हा पिढ्यानपिढ्या चालणारा मराठी सण असून या सगळ्या गोष्टी तोडण्याचा कट आखला जात आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. यानंतर दहीहंडीला मुंबई – ठाण्यात मनसे नेत्यांनी २० फुटांपेक्षा जास्त उंचीवर दहीहंडी लावून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे  उल्लंघन केले होते. तर गोविदा पंथकांनीही २० फुटांपेक्षा जास्त उंचीचे थर रचून कोर्टाचे आदेश धाब्यावर बसवले होते.
दहीहंडी मिसाइलने फोडायची का?, राज ठाकरेंचा सवाल