राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या संस्कृती उत्थान न्यासाकडून राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण समितीला (एनसीईआरटी) काही सूचना पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये शालेय पाठ्यपुस्तकांमधून इंग्रजी, हिंदी आणि फारसी शब्द काढून टाकावेत, अशा सूचना समितीला करण्यात आल्या आहेत. याशिवाय, क्रांतिकारी कवी पाश, गालिब यांचे शेर , रवींद्रनाथ टागोर यांचे वैचारिक लेख, चित्रकार एम.एफ. हुसेन यांच्या आत्मचरित्रामधील निवडक भाग, मुगल राजांची थोरवी सांगणाऱ्या गोष्टी, भाजपचा हिंदू पक्ष म्हणून असलेला उल्लेख, काँग्रेस पक्ष निधर्मी असल्याचा उल्लेख, शीख दंगलीविषयी मनमोहन सिंग यांनी मागितलेली माफी आणि २००२ सालच्या गुजरात दंगलीचा उल्लेख या गोष्टी ‘टाकाऊ’ असल्याचे संस्कृती उत्थान न्यासाने म्हटले आहे.

‘एनसीईआरटी’कडून अभ्यासक्रमात बदल करण्याच्यादृष्टीने देशभरातून सूचना मागवण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर दीनानाथ बात्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्यासाकडून एनसीआरटीला तब्बल पाच पानी सूचनापत्र पाठवण्यात आले आहे. याबद्दल बोलताना न्यासाचे सचिव अतुल कोठारी यांनी म्हटले की, सध्याच्या पाठ्यपुस्तकांमधील अनेक गोष्टी निराधार आणि पक्षपाती आहेत. त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांना चुकीच्या लोकांची महती सांगून त्यांची दिशाभूल कशी काय करू शकता?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, विवेकानंद आणि सुभाषचंद्र बोस यांसारख्या महापुरूषांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती नाही. त्यामुळे एनसीआरटी आम्ही पाठवलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार करेल, असा विश्वास कोठारी यांनी व्यक्त केला.

ज्ञानसंगमातील गोटे

या संचातील ‘प्रेरणादीप’ या शीर्षकाखालील चार पुस्तकांची मालिका आहे. यातील गोसेवा या प्रकरणात मूलबाळ नसलेल्या एखाद्या दाम्पत्याने गाईची सेवा केली तर त्यांना इच्छित फळ कसे प्राप्त होऊ शकते, हे सांगण्यात आले होते. याशिवाय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि स्वामी विवेकानंद यांच्या हजरजबाबीपणाचे काही किस्सेही आहेत. शिक्षणाचे भारतीयीकरण या पुस्तकात विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनातून शिक्षण हा भाग आहे. विद्यार्थ्यांनी संग्राहक व्हावे या उद्देशाने त्यांनी तिकिटे, विविध आकारांचे दगड, टपाल तिकिटे, चित्रे, पक्ष्यांची पिसे मिळवून चिकटवही बनवावी, सामाजिक उपक्रमातील सहभाग वाढवावा, दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहावेत असे सुचविण्यात आले होते. याच पुस्तकात ‘प्रोफेसर’ऐवजी ‘आचार्य’ हा पर्यायी शब्द देण्यात आला होता. ‘प्रोफेसर’ हा केवळ शिकवतो, प्रवचन देतो, तर आचार्य जे शिकवतात ते आचरणात कसे आणावे याचा परिपाठ घालून देतात. त्यामुळे इंग्रजीचा दिखाऊपणा सोडून चिरंतन टिकणारे आचार्यपण अंगी बाणवण्याचा सल्ला या पुस्तकातून देण्यात आला होता.

मा. बात्राजींची शैक्षणिक क्रांती