माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आसामसाठी काहीही केले नाही, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आरोप असत्य असल्याचे डॉ. सिंग यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी आपल्या कामाची पावती द्यावी अशी आपली इच्छा नाही, मात्र मोदी यांनी जो आरोप केला आहे तो असत्य आहे आणि त्यांची मोदींनाही जाणीव आहे, असे डॉ. सिंग म्हणाले. दिसपूर येथील सरकारी शाळेतील मतदानकेंद्रात मतदान केल्यानंतर डॉ. सिंग वार्ताहरांशी बोलत होते.

काँग्रेसने गेल्या १५ वर्षांत राज्यासाठी जे काम केले त्याचे बक्षीस मतदार काँग्रेसला देतील, असेही माजी पंतप्रधान म्हणाले. डॉ. मनमोहन सिंग आणि त्यांच्या पत्नी गुरशरणकौर या दिसपूर मतदारसंघात मतदार आहेत. डॉ. सिंग हे १९९१ पासून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करीत आहेत. भाजपने आसामच्या विकासावरून वारंवार मनमोहनसिंग यांच्यावर टीका केली आहे.