आयआयटीमध्ये प्रवेशासाठी ‘जेईई अॅडव्हान्स‘ परीक्षेत जोधपुरच्या अमन बन्सल याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर, भावेश धिंग्रा हा दुसरा आणि कुणाल गोयल हा तिसऱ्या स्थानावर आहे. जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल आज रविवार सकाळी जाहीर करण्यात आला. जेईई अॅडव्हान्स परिक्षेला जवळपास दोन लाख विद्यार्थ्यी बसले होते. ही परिक्षा पेपर-१ आणि पेपर-२ या दोन भागांमध्ये घेण्यात आली होती. या परिक्षेमुळे विद्यार्थ्यांना देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविता येईल. सात विभागांपैकी आयआयटी मुंबईसाठी सर्वाधिक ८८१० विद्यार्थी पात्र झाले आहेत. त्यापाठोपाठ आयआयटी मद्राससाठी ६७०२ विद्यार्थी, आयआयटी दिल्लीसाठी ५९४१ विद्यार्थी पात्र झाले आहेत. सदर परिक्षा आयोजित करणा-या आयआयटी गुवाहाटीने सांगितले की, जेईई अॅडव्हान्स २०१६ परीक्षेमध्ये मिळालेली रँकिग आयआयटी किंवा आयएसएममध्ये प्रवेशाची हमी देत नाही. ही यादी विद्यार्थ्यांच्या जेईई अॅडव्हान्स परिक्षेत मिळालेल्या एकूण गुणांवर आधारित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.