पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लालकिल्यावरुन भाषण करताना मोदींनी बुलेटप्रूफ सुरक्षा घ्यावी, असा सल्ला गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.
१५ ऑगस्टला ड्रोनच्या साह्याने त्यांच्यावर हल्ला करण्याची शक्यता असल्याचे गुप्तचर खात्याने सांगितले आहे. मोदी अनेकदा सुरक्षा न घेता भाषण करण्याला प्राधान्य देतात. पण, जर मोदींनी सुरक्षा यंत्रणांचा सल्ला मान्य केला तर त्यांच्या आजूबाजूला एवढी कडेकोट सुरक्षा असण्याची ही पहिलीच वेळ असेल.
धुमसतं काश्मीर आणि अन्य जागतिक राजकारणामुळे मोदींच्या जीवाला धोका आहे. आयसिस, अल-कायदाशिवाय लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिद्दीन यांसारख्या अतिरेकी संघटनाही भारतात आत्मघाती हल्ले करण्याचा कट सतत रचत असतात.