जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात गुरूवारी सकाळी भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवादी आमनेसामने आले. यावेळी त्यांच्यात तुफान चकमक झाली. यामध्ये दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत, तर तीन जवान जखमी झाले आहेत. शहीद झालेल्यांमध्ये मेजर पदावरील अधिकाऱ्याचा समावेश आहे.

तत्पूर्वी येथील कुलगाम जिल्ह्यात भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्यांच्याजवळ काही शस्त्रसाठाही मिळाला आहे. यापैकी एका दहशतवाद्याची ओळख पटली असून १ मे रोजी काश्मीरमधील एका बँकेच्या एटीएम व्हॅनवर घालण्यात आलेल्या दरोड्यात त्याचा सहभाग होता. यावेळी पाच पोलिसांना आणि दोन सुरक्षारक्षकांना प्राण गमवावा लागले होते.

काही दिवसांपूर्वीच काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचा काश्मीरमधील टॉप कमांडर अबू दुजाना भारतीय सैन्याशी झालेल्या चकमकीत ठार मारला गेला होता. भारतीय लष्कराच्यादृष्टीने हे खूप मोठे यश मानले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाया यशस्वी ठरल्या असून ‘लष्कर’चे अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये कमांडर बाशिर लष्करीचाही समावेश आहे.

दरम्यान, अबू दुजानाची जागा आता अमरनाथ यात्रेदरम्यान भाविकांच्या बसवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू इस्माईल घेणार आहे. लष्कर – ए-तोयबाच्या काश्मीरच्या कमांडरची सूत्रे लवकरच अबूकडे सोपवली जाणार आहेत, असे समजते. मूळचा पाकिस्तानी नागरीक असलेला अबू इस्माईल हा अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं होतं. या हल्ल्यात सहा महिला भाविकांसह सात जणांचा मृत्यू झाला होता. तर १९ जण जखमी झाले होते. अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर इस्माईलच्या शोधासाठी सुरक्षा दलानं विशेष मोहीम हाती घेतली होती. दक्षिण काश्मीरमध्ये विशेष सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सहा महिलांसह सात भाविक ठार झाले होते. लष्कर- ए- तोयबाने हा हल्ला केल्याचं तपासातून समोर आलं होतं. मूळचा पाकिस्तानचा असलेला कमांडर अबू इस्माईलने या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती समोर आली होती. गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागलेल्या सांकेतिक भाषेतील संभाषणाच्या आधारे अबूचा या हल्ल्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते.

‘लष्कर’चा कमांडर दुजाना वासनांध होता; काश्मिरी मुलींना त्रास द्यायचा!