जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमार हा लवकरच आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगांचा समावेश असलेले एक पुस्तक लिहिणार आहे. बिहारमधील आपल्या दुर्लक्षित खेडय़ापासून सुरू झालेल्या आणि देशद्रोहाच्या खटल्यापर्यंत पोहोचलेल्या प्रवासातील उल्लेखनीय प्रसंगांचा समावेश या पुस्तकात करण्यात येणार आहे.
सदर पुस्तकाचे नाव ‘बिहार टू तिहार’ असे असून त्यामध्ये आपल्या शालेय जीवनापासून ते विद्यार्थी संघटनेचे राजकारण, त्याला करण्यात आलेली अटक आणि त्यानंतरचे प्रसंग यांचे वर्णन पुस्तकात केले जाणार आहे.
एखाद्या व्यक्तीला ठार करणे सोपे असते, मात्र तुम्ही त्याच्या विचारांची हत्या करू शकत नाही, असे शहीद भगतसिंग म्हणाले होते. आपला लढा कोणत्या स्तराला पोहोचेल त्याची कल्पना नाही, मात्र विचार इतिहासात नोंदले जावेत असे वाटते, असे कन्हैयाकुमारने म्हटले आहे. भारतातील युवकांची अपेक्षा आणि त्यांचा संघर्षही वैयक्तिक अनुभवांमधून मांडण्यात येणार आहे. हे पुस्तक जगरनॉट प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित केले जाईल. कन्हैया हा प्रत्येकाचा आवाज आहे, तो प्रत्येकाने ऐकला पाहिजे, असे जगरनॉटचे प्रकाशक चिकी सरकार यांनी म्हटले आहे.