नेपाळमध्ये मोठय़ा भूकंपानंतर तेथे आणखी धक्के बसण्याच्या शक्यता वर्तवताना प्रसारमाध्यमांनी संयम बाळगावा असे सरकारने सांगितले आहे. आणखी धक्के बसतील असे सतत सांगत राहिल्याने मदत कार्यात अडथळे येतात व लोक आणखी गोंधळतात असा दावा सरकारने केला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून नेपाळमध्ये अडकून पडलेल्या लोकांना सोडवण्यासाठी समन्वित प्रयत्न सुरू केल्याने त्यात चुकीच्या माहितीमुळे अडथळे येऊ नयेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
माध्यमसमूहांनी भूकंपाच्या धक्क्य़ांबाबत माहिती देताना सावधानता बाळगावी, विनाकारण पुन्हा भूकंपाचे धक्के बसणार असल्याचे सांगून घबराट निर्माण केल्याने मदत कार्यात अडथळे येतात, असे सरकारचे म्हणणे आहे. नेपाळमध्ये काल झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.९ रिश्टर होती व त्यात दोन हजाराहून अधिक लोक मारले गेले आहेत. नेपाळमध्ये कालच्या धक्क्य़ानंतर रविवारी पुन्हा दोन धक्के बसले असून ते भारतातही जाणवले आहेत.