पंतप्रधान मोदींचा इशारा; ही अखेरची रांग असल्याची ग्वाही; भिकाऱ्याकडील स्वाइप मशीनचाही दाखला जनधन योजनेतील खात्यांत काळा पैसा जमा करणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगवारी कशी घडविता येईल, याबाबत विचार सुरू असल्याचे स्पष्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा पैसा गरिबांचाच असेल, अशी ग्वाही शनिवारी दिली. गेली ७० वष्रे दैनंदिन गरजांसाठी रांगेत उभे राहणाऱ्या जनतेसाठी निश्चलनीकरणाच्या पाश्र्वभूमीवर ही अखेरची रांग आहे. अगदी भिकारीही ‘स्वाइप मशीन’ वापरत असल्याचा दाखला देत डिजिटलची कास धरण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपच्या परिवर्तन सभेत बोलताना मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील मुद्दय़ांना स्पर्श करतानाच विरोधकांनाही लक्ष्य केले. निश्चलनीकरणानंतर काळा पैसेवाले लोक गरिबांच्या दारापुढे रांग लावत आहेत. हे भ्रष्ट लोक जनधन योजनेतील खात्यांत काळा पैसा जमा करण्याची विनवणी गरिबांकडे करीत आहेत. जनधन खातेधारकांनी आपल्या खात्यात इतरांनी जमा केलेल्या या पैशाला हात लावू नये. या भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात कसे पाठवता येईल, याचा विचार सुरू असल्याचे मोदी यांनी सांगितले. नोटाबंदीनंतर बँका आणि एटीएमबाहेर लागलेल्या रांगांवरून लक्ष्य करणाऱ्या विरोधकांवरही पंतप्रधानांनी टीका केली. स्वातंत्र्यानंतर तुम्ही देशाला ७० वष्रे रांगेत उभे केले. अगदी साखर, केरोसीन, गव्हासाठी लोकांना रांगेत उभे राहावे लागले. अशा सर्व रांगा संपविण्यासाठी ही अखेरची रांग असल्याचे सांगत पंतप्रधानांनी निश्चलनीकरणाच्या निर्णयाचे ठाम समर्थन केले. रोकडरहित व्यवहारावर जोर देण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. भिकाऱ्याकडेही ‘स्वाइप मशीन’ असल्याचा व्हिडीओ ‘व्हॉटसअॅप’वरून सर्वत्र प्रसारित झाला आहे. त्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी रोकडरहित व्यवहारांची कास धरण्याचे आवाहन या वेळी केले. देशात ४० कोटी स्मार्टफोन आहेत. किमान या फोनधारकांनी तरी डिजिटलद्वारे पैसे चुकते करावेत. सद्हेतूने केलेल्या गोष्टींचा जनतेने विनाविलंब स्वीकार करायला हवा, असेही मोदी म्हणाले. मोदी म्हणाले.. प्रामाणिक लोकच पैसे जमा करण्यासाठी बॅंकांसमोर उभे राहू शकतात. तर भ्रष्ट लोक गरिबांच्या दारापुढे रांगा लावत आहेत. भ्रष्टाचाराविरोधात लढा सुरू करून मी गुन्हाच केला आहे, असे विरोधकांचे वर्तन आहे. पण भ्रष्टाचाराविरोधात लढा देणे हा गुन्हा आहे का? देशातील जनताच माझ्या दृष्टीने ‘सर्वोच्च नेता’ आहे.