इराकमधील इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया(आयएसआयएस) या दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या ४० भारतीयांपैकी ३९ जणांची हत्या केल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दिल्याने खळबळ उडाली आहे. दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटलेल्या एका नागरिकाच्या आधारावर हे वृत्त देण्यात आले आहे. दरम्यान, अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नसल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली.
इराकमधील भारतीयांची हत्या झाल्याच्या बातम्या येत आहेत परंतु, त्यावर विश्वास ठेवू शकत नाही. याची पुष्टी करणारे सबळ पुरावे उपलब्ध नसल्याची माहिती स्वराज यांनी दिली. तसेच इराकमधील कोणकोणत्या भागात भारतीय अडकून पडले आहेत याचा शोध घेत आहोत. त्यामुळे या सगळ्या घटनेवर लगेच मत व्यक्त करणे घाईचे ठरेल, असेही त्या पुढे म्हणाल्या. तेथील भारतीयांच्या कुटुंबियांशी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी संपर्कात असून त्यांना परत आणण्यासाठी तीन अधिकारी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
इराकमध्ये  पाच महिन्यांपूर्वी ४० भारतीय नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते, आयएसआयएसच्या तावडीतून जिवंत वाचलेल्या भारतीय नागरिक हरजित याच्याशी दोन बांग्लादेशी नागरिकांचा संपर्क झाल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. या दोन बांग्लादेशी नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर इराकमध्ये ३९ भारतीयांची हत्या करण्यात आल्याचे वृत्त देण्यात आले आहे